- आ. अमित गोरखे यांची मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 16 ऑगस्ट 2025) :- निगडी परिसरात शुक्रवारी (१५ ऑगस्ट) बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबरच्या कामादरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेत तीन कंत्राटी कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
आमदार अमित गोरखे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना ईमेलद्वारे पत्र पाठवले. यात मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ₹10 लाखांची, तर जखमींना प्रत्येकी ₹5 लाखांची मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकारने उचलावा, अशीही मागणी गोरखे यांनी केली.
या दुर्घटनेत दत्ता होलारे, लखन धावरे व साहेबराव गिरसेप या तीन कामगारांचा मृत्यू झाला. स्वातंत्र्यदिनासारख्या शुभ दिवशी घरातील आधारस्तंभ गमावल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गोरखे यांनी आपल्या पत्रात या घटनेस जबाबदार असलेल्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पीडित कुटुंबांना तातडीने न्याय व मदत मिळावी यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
















