- पाणीपुरवठ्याची गरज आणि उपायोजनाबाबत बैठक घ्यावी
- मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आमदार लांडगे यांची मागणी
पिंपरी-चिंचवड (दि. 16 ऑगस्ट 2025) :- पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या ३५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. सन २०५१ पर्यंत ती जवळपास १ कोटीपर्यंत जाण्याचा अंदाज असून त्यानुसार किमान ८०० एमएलडी पाणी पुरवठ्याची आवश्यकता निर्माण होणार आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलस्त्रोत निर्माण करणे, तसेच सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देणे अत्यावश्यक आहे. यासाठी संबंधित मंत्री व उच्चाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन ‘‘ॲक्शन प्लॅन’’ तयार करावा, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या पवना, आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातून शहराला पाणी उपलब्ध होत आहे. पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील निर्बंध हटवण्यात आले असले तरी प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाण्याचा पुरवठा सुरू झाला आहे, तर भामा-आसखेड प्रकल्पाचे काम सुरू असले तरी गती देण्याची गरज आहे.
दरम्यान, वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर चासकमान, ठोकरवाडी आणि मुळशी धरणातून पाणी आरक्षित करण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. शहरातील वाढत्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणीटंचाईच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्याची आवश्यकता असल्याचे आमदार लांडगे यांनी स्पष्ट केले आहे.
“पिंपरी-चिंचवड शहराची वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि भविष्यातील पाणी गरजा लक्षात घेता, जलस्रोतांची नियोजनबद्ध वाढ आणि सुरू असलेल्या पाणी प्रकल्पांना गती देणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांना शाश्वत आणि पुरेसा पाणी पुरवठा मिळावा यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच आढावा बैठक घेतली जाईल. शहरासाठी आवश्यक निर्णय वेळीच घेतले जातील, यासाठी मी कटिबद्ध आहे.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड…
















