- रस्ते, कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा विषयांना सर्वाधिक प्राधान्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘अर्थसंकल्पात नागरी सहभाग’ या उपक्रमाला विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. अर्थसंकल्प २०२६–२७ साठी तब्बल ५ हजार १०२ नागरिकांचे अभिप्राय प्राप्त झाले आहेत. हे प्रमाण मागील वर्षीपेक्षा दुप्पट आहे.
गेल्या वर्षी या उपक्रमांतर्गत २ हजार २७९ नागरिकांचे अभिप्राय प्राप्त झाले होते. यंदा १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात आला असून शहरातील सर्व आठ प्रभागांमधील रहिवाशांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये प्रभाग ‘ड’ मधून सर्वात जास्त १ हजार १६१ अभिप्राय प्राप्त झाले आहेत. अभिप्राय पाठवण्यासाठी तीन दिवस बाकी असताना म्हणजेच १३ ते १५ सप्टेंबर २०२५ या काळात तब्बल २ हजार पेक्षा जास्त नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.
अर्थसंकल्पात नागरी सहभाग उपक्रमांतर्गत नागरिकांनी सुचवलेल्या योजनांसाठी त्यांच्या परिसरात वसूल होणाऱ्या मालमत्ता कराच्या १० टक्के निधीची तरतूद केली जाते. यंदा या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादातून नागरिकांचा महापालिकेवरील वाढता विश्वास दिसून आला आहे. या अभिप्रायांमध्ये रस्ते विकास, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा सुधारणा, उद्याने, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि सार्वजनिक सोयीसुविधा यांचा समावेश होता.
अर्थसंकल्पात नागरी सहभाग उपक्रमामध्ये ५ हजार १०० हून अधिक नागरिकांनी प्रतिसाद देणे हे पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या नागरी सहभागाचे प्रतीक आहे. नागरिकांच्या या सूचनांमुळे वर्ष २०२६–२७ चा अर्थसंकल्प हा अधिक प्रतिसादक्षम आणि समावेशक तयार करण्यास मदत होईल. नागरिकांकडून आलेल्या सूचनांचे तांत्रिक परीक्षण करून त्यानंतर मंजूर कामांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. या कामांचा आर्थिक वर्ष २०२६–२७ च्या अर्थसंकल्पात समावेश करण्यात येईल.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका















