न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ, (दि. १९ सप्टेंबर २०२५) :- आमदार सुनील शंकरराव शेळके यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या जनसंवाद अभियानाचा पुढील टप्पा सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे व इंदोरी या गावांत पार पडला. या वेळी आमदारांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, तक्रारी आणि विकासाशी निगडित अपेक्षा जाणून घेतल्या.
ग्रामस्थांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते खुले करणे, घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करून घंटागाडीची सोय, इंदोरी–जांबवडे रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे, प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांना तातडीने लाभ, जलजीवन मिशन योजनांतील अडथळे दूर करणे, रेशनिंगमधील अडचणी, जातीचे दाखले आणि इतर शासकीय दाखले मिळविण्याच्या समस्या आदींचा समावेश होता.
नागरिकांनी या समस्या तोंडी तसेच लेखी स्वरूपात सादर केल्या. सर्व अर्जांची दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन आमदार शेळके यांनी दिले. गावोगाव संवाद साधून समस्या मार्गी लावणे हीच आपली बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमात जांबवडे गावातील ठाकर बांधवांना जातीची २० प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. ग्रामस्थांनी या अभियानाचे स्वागत करत, “आमदार सुनील शेळके हे समस्या गांभीर्याने घेऊन तत्परतेने उपाययोजना करणारे लोकप्रतिनिधी आहेत”, असा विश्वास व्यक्त केला.












