- ‘दिवसाआड पाणीपुरवठा ही प्रशासनाची अकार्यक्षमता’..
- आम आदमी पार्टीकडून महापालिकेला निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या पाण्याच्या टंचाईच्या गंभीर समस्येवर उपाययोजना न झाल्यास ‘बांधकाम बंदी’ घालावी, अशी ठाम मागणी आम आदमी पार्टीने महापालिकेकडे केली आहे. शहराध्यक्ष रविराज काळे यांनी यासंदर्भात आयुक्तांना निवेदन सादर केले.
शहरात पाणीपुरवठा दिवसाआड आणि कमी दाबाने होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. तरीही महापालिकेकडून नव्या बांधकामांना परवानग्या देण्यात येत असल्याने विद्यमान पाणीव्यवस्थेवर अतिरिक्त भार पडत आहे, असे काळे यांनी सांगितले.
‘जोपर्यंत नागरिकांना दिवसातून दोन वेळा पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये आणि सुरू असलेल्या प्रकल्पांना ‘स्टॉप वर्क’ नोटीस द्यावी,’ अशी मागणी ‘आप’ने केली आहे. तसेच शहरासाठी स्वतंत्र धरण उभारण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन सादर करताना नवनाथ मस्के, शुभम यादव, विकी पासोटे, राहुल मदने, अॅड. सुप्रिया गायकवाड, शिवकुमार बनसोडे, यल्लापा वालदोर, लक्ष्मण माने आणि अभिजित कदम उपस्थित होते.













