न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १९ फेब्रुवारी २०२६) :- ‘शिवगर्जना’ महानाट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेमागील उद्देश, लोकाभिमुख प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेला संघर्ष प्रभावीपणे दाखविण्यात येत आहे. आजच्या काळात इतिहास केवळ लक्षात ठेवण्याचा विषय राहिलेला नाही, तर त्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे करताना न्याय, समता आणि कष्टकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवले होते. हीच भूमिका आजच्या तरुणांनी स्वीकारली, तर समाजात सकारात्मक बदल घडू शकतो. युवकांमध्ये राष्ट्राभिमान जागवण्याबरोबरच समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव निर्माण करण्याची ताकद या महानाट्याच्या सादरीकरणात आहे, असे प्रतिपादन थोर सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘विचार प्रबोधन पर्वा’अंतर्गत सादर करण्यात आलेल्या ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचा दुसरा प्रयोग बुधवारी १८ फेब्रुवारी रोजी निगडी येथील नियोजित महापौर निवास परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. या महानाट्यास थोर सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित राहून संपूर्ण महानाट्य पाहिले, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे, उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य अमित गावडे, नगरसदस्य मारुती भापकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जाधव,वैभव जाधव,संतोष सातपुते, आबासाहेब ढवळे, सतीश काळे, संतोष कवडे,श्रीमंत जगताप,नागनाथ म्हस्के, ज्ञानेश्वर लोभे, सचिन आल्हाट, संदीप निकम, कुणाल कांबळे, सचिन बोराडे, संदीप बोराडे, सागर तापकीर,जीवन बोराडे, स्वप्निल शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवगर्जना महानाट्याद्वारे ऐतिहासिक घटनांवर आधारित प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण, भव्य नेपथ्यरचना, पारंपरिक वेशभूषा आणि आधुनिक तांत्रिक साधनांच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या दृश्यांमुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. सादरीकरणादरम्यान अनेक प्रसंगांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला.
या महानाट्यातून स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, किल्ल्यांच्या लढाया, आरमार उभारणी तसेच शिवकालीन प्रशासनव्यवस्थेचे विविध पैलू नाट्यमय पद्धतीने उलगडण्यात आले. कलाकारांच्या जिवंत अभिनयातून साकारलेल्या प्रसंगांमुळे इतिहासाचा थरार अनुभवण्याची संधी उपस्थितांना मिळाली.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने नागरिकांसाठी स्त्री,पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आवश्यक नागरी सुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच वाहतूक नियोजन करण्यात आले होते.
भव्य फटाक्यांच्या आतषबाजीमुळे उजळून निघाला निगडी येथील भक्ती शक्ती चौक….
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त निगडी येथील भक्ती शक्ती समुहशिल्प उद्यान येथे भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने रात्री भव्य फटाक्यांच्या आतषबाजीचे आयोजन करण्यात आले होते. आकर्षक प्रकाशरेषा, रंगांची उधळण आणि विविध आकाशदीपांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. उपस्थित नागरिकांनी मोठ्या उत्साहात या आतषबाजीचा आनंद घेत जयंती सोहळ्याला जल्लोषमय वातावरणात साजरे केले. या नेत्रदीपक आतषबाजीमुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.












