न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- राष्ट्राची सुरक्षा व जागतिक पातळीवर देशाचे सामर्थ्य बलवान करण्याची सांगड डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात गुंफल्याने भारत देश कुठल्याही संकटाचा समर्थपणे मुकाबला करू शकतो असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी आज येथे केले.
पद्मयानी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, संविधान दिन सोहळा समिती, श्री संत रोहिदास महाराज उन्नती संस्था यांच्या वतीने आयोजित भारतीय संविधान जनजागरण अभियानाच्या १२ व्या पुष्पमालिकेत ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई महापालिकेचे सेवानिवृत्त लेखापाल अच्युतराव भोईटे होते. यावेळी संत रोहिदास उन्नती संस्थेच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त दहावी व बारावी परिक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विदयार्थ्यांचा तसेच राष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळविलेलया विदयार्थ्यांचा मिटकॉनचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश खामगळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खामगळ यांचे ‘करियर व दिशा’ याविषयावर विशेष व्याख्यान झाले.
आपल्या भाषणात डॉ. खरे म्हणाले, सद्यस्थितीत काही मनुवादी शक्ती घटना बदलण्याचा डाव आखत असले तरी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मार्गदर्शक तत्वांवर आधारलेली राज्यघटना इतकी मजबूत आहे की, तिला धक्का लावण्याचे त्यांचे सारे प्रयत्न व्यर्थ पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. अशोक शिलवंत, दत्तात्रय सुर्यवंशी, युवराज कोकाटे, सुदाम कांबळे, विष्णु मांजरे, विजय गेडाम, पांडुरंग वाघमारे लक्ष्मण मुदळे, माजी नगरसेविका वैशाली उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत रोहिदास महाराज समाज उन्नती संस्थेचे अध्यक्ष सागर सुर्यवंशी यांनी केले. तर भारत गवळी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. महादेव वाघमारे यांनी केले.