न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०१९) :- रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध येथे ‘जागतिक लोकसंख्या दिन’ प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. डॉ. आंबेडकर महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि कुटुंब नियोजन कल्याण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डॉ. मुकुंद महाजन, डॉ. प्रविण सोनावणे, श्री. निशिकांत श्रोत्री, मराठी अभिनेत्री गायत्री दातार (‘तुला पाहते रे’ या मराठी मालिकेतील सिनेतारिका इशा निमकर) उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय लोखंडे उपस्थित होते.
माजी प्राचार्य डॉ. मुकुंद महाजन म्हणाले की, समाजाचे प्रबोधन करण्याच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जात आहे. ‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा करण्यामागचा खरा उद्देश समाजाचा विकास करणे हा आहे. लोकसंख्या नियंत्रित झाल्यास कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. प्रविण सोनावणे म्हणाले की, लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी समाजात प्रचार आणि प्रसार करावा लागेल. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी शासनाने कुटुंबकल्याण योजनेचा वापर केलेला दिसतो. माता मृत्यू प्रमाण कमी व्हावे म्हणून शासनाने १९७२ साली गर्भपात कायदा केला. शासनाने ‘एक कुटुंब एक मूल’ असा कायदा अंमलात आनल्यावर मुलींच्या जन्माचे प्रमाण घडलेले दिसते. गर्भपातामुळे प्रतिवर्षी १८ टक्के स्त्रिया मृत्युमुखी पडतात. त्यामुळे नंतर ‘कुटुंब नियोजित पालकत्व’ ही संकल्पना आलेली दिसते. जर आजच्या तरुणांनी ‘कुटुंब नियोजित पालकत्व’ या संकल्पनेचा वापर केला तर आनंदी कुटुंबाची आणि समाजाची निर्मिती होईल, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. धनंजय लोखंडे म्हणाले की, कुटुंब नियोजनाबरोबर आपले आरोग्य जपले पाहिजे. मुलांना योग्य जोडीदाराची निवड करता आली पाहिजे. नव्या पिढीने कुटुंब नियोजन करावे. आपल्या मुलांना चांगले आरोग्य, चांगले शिक्षण मिळावे म्हणून कुटुंब नियोजन करावे. त्यामुळे कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मराठी सिनेतारिका गायत्री दातार (‘तुला पाहते रे’ या मराठी मालिकेतील अभिनेत्री ईशा निमकर) म्हणाल्या की, आपला जोडीदार कसा असावा. आपल्या कुटुंबात किती मुले असावीत. याचे योग्य नियोजन करावे. कारण आपल्यापेक्षा आपली मुले हुशार असणार आहेत. आपल्या मुलांना चांगले आणि आनंदी जीवन जगता यावे म्हणून कुटुंब नियोजन महत्वाचे आहे, असे मत व्यक्त करुण सर्व विद्यार्थ्यांना ‘लोकसंख्या नियंत्रणाची प्रतिज्ञा’ दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख इंग्रजी विभागप्रमुख डॉ.सविता पाटील यांनी तर आभार मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. तानाजी हातेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सायली गोसावी यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रा. भीमराव पाटील, प्रा.मयुर माळी, प्रा.किरण कुंभार, डॉ.सविता पाटील, डॉ.अतुल चौरे आणि बहुसंख्येने विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.











