न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- केरळी बांधव हे कष्टाळू असून, पिंपरी चिंचवड शहराच्या विकासामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे, असे मत खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केले.
विश्व विवेक फाऊंडेशन, पुणे शिकलगार सेवा संघ आणि पुणे मल्ल्याळी यांच्या विद्यमाने रविवारी प्राधिकरणातील केरळ भवन येथे विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींचा गौरव करण्यात आला. त्यावेळी साबळे बोलत होते.
यावेळी राज्यलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, महापौर राहुल जाधव, प्राधिकरणाचे नवनियुक्त अध्यक्ष सदाशिव खाडे, पुणे मल्ल्याळी फाऊंडेशनचे अध्यक्ष के. हरिनारायणन्, सांस्कृतिक कलाकार तेजश्री अडिगे यांना गौरवण्यात आले.
यावेळी विश्व विवेक फाऊंडेशनचे संस्थापक व नगरसेवक बाबू नायर, पुणे जिल्हा शिकलगार समाजाचे अध्यक्ष सलिम शिकलगार, पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, थरमॅक्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एम. एस. उन्नीकृष्णन, शिक्षण मंडळ समितीच्या उपसभापती शर्मिला बाबर, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, मोहनदास नायर, दिलीप नायर आदी उपस्थित होते.
साबळे पुढे म्हणाले की, केरळ ही देव भूमी असून, केरळी म्हणजे मलबारी. त्यांचा देशाच्या जडण-घडणीमध्ये मोलाचा वाटा आहे. केरळी बांधव देशातील अन्य राज्यांमध्ये अथवा परदेशामध्ये कामानिमित्त स्थायिक झाले आहेत. ते जेथे जातात तेथील सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आनंदाने सहभागी होतात. स्थानिक संस्कृतीत एकरूप होतात, असे ही साबळे यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना ॲड. सचिन पटवर्धन म्हणाले की, पिंपरी चिंचवड म्हणजे मिनी इंडिया आहे. या औद्योगिक नगरीत सर्व जाती धर्माचे, वेगवेगळ्या प्रांतामधील नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. आपला उदरनिर्वाह करीत असताना सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान असते. अद्यापही प्राधिकरणाकडे ५०० एकर जमीन आहे. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार २०२२ पर्यंत सर्व कुटुंबांना १८ ते ३२ लाख रुपयांची अल्प किंमतीची घरे बांधण्यासाठी योजना राबविण्यात येईल. सामान्य कार्यकर्त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम भाजपा करते. त्याप्रमाणे नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्य करत आहोत, असे ॲड. सचिन पटवर्धन म्हणाले.
महापौर राहुल जाधव म्हणाले की, सामाजिक कार्य करणार-या संस्थांकडून सत्कार केला जातो, तेव्हा माझ्या सारख्याला समाजाभिमूख कार्य करण्याची नवी ऊर्जा मिळते. भाजपामुळेच एका सामान्य रिक्षावाल्याला शहराचा महापौर होण्याचा मान मिळाला.
खाडे म्हणाले, सुमारे १३ वर्ष प्राधिकारणाला अध्यक्ष नव्हता. त्यामुळे प्रशासनाकडून कामकाज केले जात होते. त्यामुळे या कालावधीत जनसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाकडून लवकरच त्याबाबतची योजना सुरू करण्यात येईल.
के. उन्नीकृष्णन म्हणाले की, नुकताच केरळला पुराचा तडाखा बसला. त्यातून केरळी बांधव सावरत आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्रीय जनतेने योगदान दिले. केरळी हा बुध्दीने श्रीमंत आहे, परंतु आर्थिकदृष्ट्या तो एवढा सक्षम नाही, असे उन्नीकृष्णन यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बाबू नायर यांनी विश्व फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, युवक, युवतींना रोजगाराभिमूख प्रशिक्षण कार्यक्रम, गुणवंताचा गौरव असे कार्य केले जाते, असे नायर यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या संयोजनात अभिजित शिंदे, माधुरी कोल्हे, अरुण पाटील, बाळासाहेब पापडे, अक्षय नायर, गिताराम गाडे, अभिषेक नायर, हलिमा इक्बाल शिकलगार, नजमा शिकलगार, नजिर हुसेन शिकलगार, दाऊद अली शिकलगार, आसिफ शिकलगार, जमिर उस्मान शिकलगार, नौशाद शिकलगार, जहांगिर शिकलगार यांनी केले.
सुत्रसंचालन योगेश कदम यांनी तर आभार दिलीप नायर यांनी मानले.
















