न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज सोमवार (दि.२२) रोजी आकुर्डीतील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, सरसकट शास्तीकर माफीच्या घोषणेचे काय झाले?, रिंगरोड रद्द करावा, रेडझोनची हद्दी कमी करण्यात यावी. अनियमित पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात यावा, पेट्रोल, डिझलचे वाढते भाव, घरगुती गॅस सिलेंडरचे वाढते दर कमी करावेत, भारनियमन, दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशा मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, मा. आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, राजू बनसोडे, मयूर कलाटे, फजल शेख, अरुण बो-हाडे, विजय लोखंडे, नगरसेविका वैशाली काळभोर, अनुराधा गोफणे, स्वाती काटे, उषा काळे, निकिता कदम, वर्षा जगताप, गंगा धेंडे, कविता खराडे, सुनील गव्हाणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राज्यातील भारनियमन पूर्णपणे बंद करावे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवळे निघाले आहेत. अल्पवयीन मुली व महिलांवर अन्याय, अत्याचार, विनयभंग, बलात्कार करणाऱ्यांना कडक शिक्षा ठोठावण्यात यावी. वाढती गुन्हेगारी तसेच गाड्यांची होणारी तोडफोड करणा-यांवर कडक कार्यवाही करण्यात यावी, या सर्व कारणांमुळे जनता भयभीत झाली असून, गृह खात्याविषयी तीव्र असंतोष पसरल्यामुळे राज्याला पूर्णवेळ व स्वतंत्र गृहमंत्री देण्यात यावा अशी मागणीही आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आली आहे.
















