- अपूर्ण अवस्थेतील कामे आधी मार्गी लावा, मगच उद्घाटनाचा विचार करा – शैलेश मोरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गावर चिंचवडमधील एम्पायर इस्टेट येथे मदर टेरेसा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. उड्डाणपुलावरून वाहनांना उतरण्यासाठी व चढण्यासाठी दोन रॅम्प बांधण्यात आले आहेत. या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, महापालिकेने सोसायटीतील नागरिकांचा विरोध झुगारून एम्पायर इस्टेट हाउसिंग सोसायटीच्या आवारात दोन्ही बाजूच्या रॅम्पचे काम नुकतेच पूर्ण केले. मात्र, नागरी वस्तीतून उड्डाणपूल जात असेल तर, त्या ठिकाणी ध्वनी प्रतिबंधक यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. यासाठी रॅम्प व उणपुलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्यावर ध्वनिप्रतिबंधक उपाय म्हणून पत्रे बसविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. अद्यापही ते अपूर्णावस्थेतच असताना रॅम्पच्या कामाचा पुढील महिन्यात उद्घाटन उरकण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे यांनी जोपर्यंत उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या रॅम्पवर ध्वनी प्रतिबंधक यंत्रणा बसवून होत नाही, तोपर्यंत या दोन्ही रॅम्पचे उद्घाटन होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा प्रसिद्धीपत्रकाद्वारे घेतला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगरसेवक मोरे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुननिर्माण अभियानाअंतर्गत (जेएनएनयूआरएम) ११ किलोमीटर अंतराचा काळेवाडी फाटा ते देहू – आळंदी या बीआरटी प्रकल्पाअंतर्गत सुमारे १ हजार ६०० मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला आहे. या पुलाला महापालिका सर्वसाधारण सभेने २०१० मध्ये मान्यता देण्यात आली. त्यासाठी २०११ मध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. एम्पायर इस्टेट हाउसिंग सोसायटीच्या नागरिकांचा विरोध डावलून सोसायटीच्या आवारात दोन रॅम्प बांधण्यात आले आहेत. बांधण्यात आलेल्या या दोन्ही बाजूच्या रॅम्पचे काम अजूनही अपूर्णावस्थेत आहे. हे दोन्ही रॅम्प वाहतुकीसाठी पुढील महिन्यात खुले केले जाणार आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनकडून माध्यमांना दिली जात आहे. रॅम्पचा त्रास नागरिकांना होणार आहे. यामुळे येथील रहिवाशांनी रॅम्पला विरोध दर्शविला होता.
या ठिकाणी रॅम्प तयार करणे हे धोकादायक असल्याचे प्रशासनाला सांगितले असतानाही प्रशासनाने जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष केले.
एम्पायर इस्टेटमध्ये १६०० सदनिका, २०० दुकाने, २२ रो हाऊस आणि १५ बंगले आहेत. उड्डाणपुलामुळे रहिवाशांना त्रास होत आहे. दोन्ही बाजूला रॅम्प उतरविल्यामुळे सोसायटी परिसरात वर्दळ वाढली आहे. ही वर्दळ रहिवाशंसाठी धोकादायक ठरत आहे. वाहनांच्या आवाजाचा नागरिकांना त्रास वाढला आहे. त्यातच रात्री-अपरात्री दारुडे उड्डाणपुलावर दारू पीत बसतात. भांडणे करीत बसतात. तसेच इतरही अनेक अनुचित कृत्ये या ठिकाणी होत असतात. त्यामुळे रहिवाशी मेटाकुटीला आले आहेत. मुळात ध्वनी प्रतिबंधक यंत्रणा, दिशादर्शक फलक बसविणे व इतर अनेक कामे अपूर्ण आहेत. महापालिका प्रशासन या पुलावर बांधलेल्या रॅम्पच्या उद्घाटनाचा घाट का घालत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने कोणतेही कारण दिले, तरी या रॅम्पच्या उद्घाटनास माझा व सोसायटीतील रहिवाश्यांचा विरोध कायम राहणार आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत त्वरित कार्यवाही करून अपूर्ण अवस्थेतील कामे आधी पूर्ण करावेत व मगच उद्घाटनाचा विचार करावा, असे या पत्रकात नगरसेवक शैलेश मोरे यांनी म्हटले आहे.