- शहरातील अर्धवट स्थितीतील विकासकामांमुळे नागरिक हैराण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२०) :- केंद्र सरकारच्या वतीने महानगरातील राहण्यायोग्य शहर सर्वेक्षणासाठी नागरिकांची मते जाणून घेतली जात आहेत. त्यास पिंपरी – चिंचवड शहरातून केवळ सात हजार ४०० नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. शहराची लोकसंख्या तब्बल २५ लाख आहे. त्या तुलनेत हा प्रतिसाद – अत्यल्प आहे.
मागील वर्षभरापासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. खोदकामांमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे नागरिकांची नाराजी दिसून येत आहे. राहण्यायोग्य शहर सर्वेक्षणात देशभरातील एकूण ११४ मोठ्या शहरांचा समावेश आहे. गेल्या वर्षी या सर्वेक्षणात शहराचे स्थान ६९ वे होते. स्वच्छ सर्वेक्षणाप्रमाणे यंदा या सर्वेक्षणात नागरिकांचा प्रतिसाद पाहिला जात आहे. या सर्वेक्षणात विविध प्रश्नांचा समावेश आहे. सर्वेक्षणास महापालिकेने एक फेब्रुवारीपासून सुरुवात केली आहे.
गेल्या १२ दिवसांत केवळ सात हजार ४०० नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. सर्वेक्षणात शहरासंदर्भातील विविध २४ प्रश्न विचारले जातात. हे सर्वेक्षण केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाच्या वतीने २९ फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात नागरिकांनी सहभागी होऊन शहराबाबत आपले मत मांडावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. शहरातून एकूण २० हजार नागरिकांचा प्रतिसाद या सर्वेक्षणात नोंदविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने शाळा, महाविद्यालये, शॉपिंग मॉल, हौसिंग सोसायट्या आदी ठीकाणे जनजागृतीसाठी निवडली आहेत.