न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहरातील ६०० चौरस फुट आकाराच्या निवासी बांधकामांना शंभर टक्के, ६०१ ते १ हजार चौरस फुट आकाराच्या बांधकामांना ५० टक्के शास्तीकराची सवलत पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे.
त्यानुसार महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या संगणक प्रणालीमध्ये बदलाची कार्यवाही सुरु असून दिवाळीनंतर शास्तीकर सवलतीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.
पवार पुढे म्हणाले की, राज्य शासनाने महापालिका अधिनियम कलम २६७ ‘अ’ मध्ये दुरूस्ती केली आहे. त्याची अंमलबजावणी ४ जानेवारी २००८ पासून केली आहे. हा कायदा दुरूस्ती राज्य शासनाने १० ऑगस्ट २०१८ ला राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या करसंकलन विभागाने कार्यवाहीस प्रारंभ केला आहे. या नियमानुसार ६०० चौरस फुट आकाराच्या निवासी बांधकामांना पूर्वलक्षी प्रभावाने शास्तीकर माफ केला आहे. तर, ६०१ ते १ हजार चौरस फुट आकाराच्या निवासी बांधकामांना ५० टक्के शास्तीकर आकारण्यात येणार आहे. १ हजार १ चौरस फुटांपुढील निवासी व सर्व प्रकारच्या बिगरनिवासी बांधकामांना पूर्वीप्रमाणे २०० टक्के शास्तीकर आकारण्यात येणार आहे.
शासनाने अनधिकृत बांधकामांना शास्तीकर लागू करण्याचा निर्णय ४ जानेवारी २००८ ला घेतला होता. त्यामुळे त्या काळापासून त्याचा लाभ मिळणार आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात १ एप्रिल २०१२ पासून शास्तीकर लागू केल्याने तेव्हापासून पूर्वलक्षीप्रभावाने शास्तीकराची सवलत मिळणार आहे. परिणामी, शास्तीकराची थकबाकी असल्यास ती माफ होणार आहे.
त्यासाठी पालिकेच्या कर संकलन विभागाने संगणक प्रणालीत बदल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. हे बदल १ एप्रिल २०१२ पासून असणार आहेत. ६०० चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना यापुढे शास्तीकर भरावा लागणार नाही. तर, ६०१ ते १ हजार चौरस फुटांपर्यंतच्या बांधकांनाना ५० टक्के शास्तीकर असणार आहे. तशी बिले नव्याने तयार केली जाणार आहेत. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. संगणक प्रणाली बदलास आणखी १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष तब्बल ५० ते ६० हजार कुटुंबांना मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडकरांना शास्तीकर माफीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. त्यानूसार शहरातील भाजपच्या पदाधिकार्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यास यश आले आहे. त्यामुळे शहरातील तब्बल ५० ते ६० हजार कुटुंबांना शास्तीकराचा लाभ मिळणार आहे. तसेच त्यांची आर्थिक भुर्दंडातून सुटका होणार आहे. असेही पवार यांनी सांगितले.