न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२०) :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज (शनिवार) संध्याकाळी ५ वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, १४ एप्रिलपासून राज्यात आणखी १५ दिवस म्हणजे ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.
बोलताना ते म्हणाले की, आजपर्यंत जे धैर्य दाखवलंत तसंच यापुढेही दाखवा. पुण्यात सुरुवात झाली, मुंबईत रुग्ण वाढले आहेत. कारण मुंबई हे जगाचं प्रवेशद्वार आहे. आपण तपासण्या सुरु केल्या तेव्हा केंद्राकडून आलेल्या यादीतल्या देशांना बंदी होती. मात्र जे देश यादीत नव्हते त्यातले रुग्ण मिसळले. आता मुंबईत ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत ते भाग सील केले आहेत. जे रुग्ण आपल्याला सापडलेत त्याची तपासणी महापालिका घरोघरी जाऊन करते आहे.
दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला आहे ती संख्या वाढते आहे. ज्यांचं वय जास्त आहे त्यांचा धोका वाढतो आहे. ज्यांना आधीपासून काही विकार आहेत अशा रुग्णांवर करोनाचा गंभीर परिणाम होतो आहे. त्यामुळे मास्क लावा, असेही ठाकरे म्हणाले.