न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १५ नोव्हें.) :- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो, यानिमित्ताने पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फांउडेशनच्या वतीने “आधार बाल आंगन’ ( मजदूर, कामगार मुलांची शाळा ) या शाळेमध्ये बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, अध्यक्षा कुंदा भिसे, रुपाली धुमाळ, विकास काटे, राजेंद्र पाटील, आनंद हास्य क्लबचे सचिव राजेंद्र जयस्वाल, अतुल पाटील, रोहिदास गवारे, विवेक भिसे यांच्यासह परिसरातील सामाजिक, राजकीय शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी या शाळेतील लहान मुला-मुलींना खाऊ, चित्रकलेचे साहित्य व शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काही तरी देणे लागतो, ही भावना मनात ठेवून समाजातील सर्वच घटकांनी अशा प्रकारचे कार्यक्रम राबविणे काळाची गरज आहे. कामगारांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी ज्या शालेय साहित्याची आवश्यकता आहे ते जर शहरातील सामाजिक संघटना, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन पुरविले तर खऱ्या अर्थांनी बालदिन साजरा केल्यासारखे होईल. या निमित्ताने राजेंद्र पाटील व शाळेच्या व्यवस्थापक रुपाली धुमाळ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.