न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जुलै. २०२०) :- प्रतापगडाच्या (ता. महाबळेश्वर) मुख्य ध्वज बुरुजाच्या डाव्या बाजूस असलेल्या तटबंदीचा खालील काही भाग काही दिवसांपूर्वी ढासळला. यामुळे गडाच्या तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. किल्ल्याची तटबंदी पूर्णपणे कमकुवत झाली असून त्याच्या दुरुस्तीची गरज आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच बुरुजाचे काम सुरू करण्याची मागणी पिंपरी चिंचवड शहर छत्रपती ग्रुप व शिवभक्त सुरज करांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
यात त्यानी म्हटले आहे की, ज्या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाची भेट घेऊन कोथळा बाहेर काढला, तोच किल्ला महाराष्ट्राची अस्मिता, शिवभक्तांचे मंदिर असणारा प्रतापगड किल्ल्याचा बुरुज काही दिवसांपूर्वी ढासळला. त्यामुळे गडकोटप्रेमी तसेच हजारो शिवभक्तांची आस त्या गडकोटावर जाण्यास लागली आहे. ज्या बहादुरगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिसरा डोळा मानला जाणारे बहिर्जी नाईक यांची समाधी आहे, त्या भूपाळगडावरही काही संरचनात्मक कामे प्रलंबित आहेत. प्रतापगडाची दुरावस्था आम्ही शिवभक्त पाहु शकत नाही.
शिवबाच्या विचारांच सरकार राज्यात आरूढ आहे. पावसाळा सुरु झाला आहे. गडकोट स्वच्छता / संवर्धन करणे खुप गरजेचे आहे. त्यामुळे शिवदुर्गांना प्रथम प्राधान्य देऊन आपण ती कामे तात्काळ मार्गी लावावीत अन्यथा सामाजिक संस्था किंवा शिवकार्य करणाऱ्या संस्थाना पुढे येण्याचे आवाहन करावे. याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यास ही जबाबदारी महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या सहकार्याने आम्हीच सुरु करू. मग, हरकत घेऊ नये, असा आशय या निवेदनात आहे.