न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर. २०२०) :-उसने पैसे माघारी देत नसल्याच्या कारणावरून एकाचे अपहरण करून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जमिनीत पुरला. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. २) दुपारी कासारसाई येथे उघडकीस आला आहे.
संतोष शेषराव अंगरख (४२, रा. पोलिस कॉलनी, रहाटणी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी शेषराव रंगनाथ अंगरख (६३) यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गणेश सुभेदार पवार आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला. गणेश यास पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादींचा मुलगा संतोषने आरोपी गणेशकडून व्यवसायासाठी पैसे घेतले होते. पैशाच्या कारणावरून त्यांच्यात वाद होता. दरम्यान, गणेश आणि त्याच्या साथीदारांनी १६ ऑगस्टला संतोषचे रहाटणीतून अपहरण केले. त्यानंतर खून करून मृतदेह कासारसाईत पुरला. प्रकरणाचा तपास करताना माने यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी गणेशला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी वाकड पोलीसात गुन्हा दाखलचे काम सुरू होते.