- केवळ ७० हजार विद्यार्थ्यांकडूनच अर्ज कायम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२०) :- रोजगाराची संधी मिळण्याची आशा मावळल्याने अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमानंतर आता पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांकडेदेखील विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.
यंदा तंत्रशिक्षण डिप्लोमासाठी तीनदा मुदतवाढ देऊनदेखील १ लाख १३ हजारांहून अधिक जागांसाठी केवळ ७० हजार विद्यार्थ्यांनीच आपले अर्ज कन्फर्म केले आहेत. त्यामुळे यंदादेखील ४० हजारांहून अधिक जागा रिक्त राहणार आहेत. यातूनच तंत्रशिक्षण डिप्लोमा प्रवेशाला उतरती कळा लागली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाकडून ( डीटीई ) दहावीनंतरच्या इंजिनिअरिंग डिप्लोमा ( पॉलिटेक्निक ) तसेच बारावीनंतरच्या फार्मसी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अशा डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया १० ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमा प्रवेशासाठी येत्या २१ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. परंतु, १५ सप्टेंबरच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात साधारण ७८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर ७० हजार विद्यार्थ्यांचेच अर्ज कन्फर्म झाले आहेत. अर्ज करण्यासाठी अद्यापि सहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. परंतु, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.