न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ०१ डिसें.) :- महापालिकेतील चार अन्न निरिक्षकांना राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या आस्थापनेवर अन्न सुरक्षा अधिकारी या गट ब संवर्गामध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्यात येणार आहे. त्यासाठी चौघाही अन्न निरिक्षकांना महापालिका सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. अन्न निरिक्षकांच्या मागील अनेक वर्षांच्या मागणीला यामुळे पुर्णविराम मिळाला आहे.
किरण जाधव, रविंद्र जेकटे, अविनाश भांडवलकर आणि लक्ष्मीकांत सावळे अशी महापालिका सेवेतून कार्यमुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत राज्यात ५ ऑगस्ट २०११ पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. ५ ऑगस्ट २०११ पासून महापालिका क्षेत्रातील अन्न परवाना विषयक सर्व कामकाज राज्य सरकारकडून होत आहे.
महापालिकेतील अन्न निरीक्षक व पर्यवेक्षक यांना अन्न सुरक्षा अधिकारी या पदावर राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासनाकडे वर्ग करण्याबाबत सरकारने तत्वत: मान्यता दिली आहे. महापालिकेकडे कार्यरत असलेल्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घेण्यासाठी संमती देण्याबाबत कळविले आहे.















