न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२०) :- उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण देश पेटून उठला आहे. अशाच काही घटना उद्योगनगरीत घडल्यानंतर त्यांचा तपास अद्यापही लागलेला नाही. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्यांचे खून झाले. यातील काही घटनांना दहा वर्षांचा कालावधी लोटून गेला आहे. मात्र अत्याचार करून खून करणारे नराधम अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
आता तर पोलिसांनी तपास करणेही सोडून दिले आहे. त्यामुळे उद्योगनगरीतील ‘ त्या ‘ पीडितांना न्याय कधी मिळणार? असा प्रश्न हाथरस’च्या घटनेनंतर पुढे आला आहे. वर्षापूर्वी घराबाहेर खेळत असलेल्या दीपाली कसबे या चार वर्षीय बालिकेने अपहरण करण्यात आले. निगडी जकात नाक्याच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर गळा दावून तिचा खून करण्यात आला.
या घटनेच्या तपासाकरिता त्यावेळच्या पुणे पोलिसांनी जंगजंग पछाडले. मात्र आरोपींचा शोध अजूनही लागलेला नाही. यामुळे दिपालीला न्याय मिळेल का, असा सवाल विचारणेही तिच्या घरच्यांनी सोडून दिले आहे.