- ऊर्जामंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांना महावितरणाने फासला हरताळ – संदीप बेलसरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२०) :- टाळेबंदीमध्ये औद्योगिक क्षेत्र काही महिने बंद होते. तरी ही वाढीव बिले आल्यामुळे उद्योग क्षेत्रात असंतोष पसरला आहे. वाढीव बिले सुधारीत करून सवलत देण्याची घोषणा सरकारने केली होती. परंतु, राज्य सरकारने त्यावर यू – टर्न घेतला आहे. तसेच, महावितरणने वीजबिले सक्तीने वसूल करा, असे आदेश दिले आहेत.
ऊर्जामंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेत देण्यात आलेल्या आश्वासनांनाच महावितरणने हरताळ फासल्याची भावना उद्योगक्षेत्रात निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे जूनपर्यंत रीडिंग घेण्यास कोणी आले नाही. जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमधील सरासरी हिशोबाने एप्रिल ते जूनची सरासरी बिले देण्यात आली. एप्रिल, मे महिन्यात वीज न वापरतादेखील सरासरी बिले देण्यात आली.
बहुतांशी उद्योग क्षेत्र जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाले. तरी सर्वांनाच सरासरी बिल भरायला लागले. महाराष्ट्रातील इतर संघटनासह पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याबरोबर व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली होती. त्यात करण्यात आलेल्या मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन उर्जामंत्र्यांनी दिले होते. परंतु, त्याला हरताळ फासून महावितरणने उद्योजकांची लूट सुरू केली असल्याचा आरोप पिं. चिं. लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी केला आहे.