न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२०) :- राज्य घटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त विविध संस्था, संघटना व आळंदी नगर परिषदेच्या वतीने रविवारी (दि.6) अभिवादन करण्यात आले.
आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. नगरपरिषदेच्या
प्रशासकीय इमारतीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला बांधकाम अभियंता संघपाल गायकवाड, लेखापरिक्षक विशाल बासरे, कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे, करसंकलन अधिकारी टी.यु. खरात, आरोग्य पर्यवेक्षिका शितल जाधव, स्वप्निल भोसले, मुकादम मालन पाटोळे व कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय बौद्ध महासभेच्या आळंदी शहर शाखेच्या वतीने अध्यक्ष तुषार रंधवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बौद्धाचार्य राजेंद्र रंधवे यांनी सामुहिक पंचशील व बुद्धवंदना घेतली.
यावेळी डॉ. निलेश रंधवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. ते म्हणाले, बाबासाहेबांनी राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चार तत्वांचा समावेश करत, भारतासारख्या विविध जाती-धर्मात विखुरलेल्या खंडप्राय देशातील नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करत त्यांना स्वातंत्र्य बहाल केले. त्यांच्या या कार्यामुळेच देशातील कोट्यवधी नागरिकांना सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळाला आहे. अमेरिकेसारख्या देशाने त्यांचा ज्ञानाचे प्रतिक (सिम्बॉल ऑफ नॉलेज ) असा यथार्थ गौरव केला आहे. अशा महापुरुषाला केवळ एका जातीत अडकवू नये, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
तसेच आळंदीत लागु केलेल्या संचारबंदीच्या काळात सर्वांनी घरीच थांबून, सर्वांनी घरातुनच बाबासाहेबांना अभिवादन करुन, करोनाविरुद्धच्या लढ्यात
सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात पार पडलेल्या या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विश्वनाथ थोरात, अक्षय रंधवे, गिरीष घोगरे, दिनेश थोरात आदी उपस्थित होते.