- कोरोनामुळे लग्न सोहळ्यात उपस्थितीवर मात्र शासनाची बंधने….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२०) :- तुळशीच्या लग्नानंतर डिसेंबर आणि नवीन वर्षातील आठ महिन्यांत ४६ मुहूर्त आहेत. तुळशी विवाह झाल्यानंतर लगीनघाईचे दिवस सुरू होतात. यासाठी अगोदरपासूनच हॉल पाहणे, पत्रिका छापण्यास देणे, आदींची तयारी सुरू होते.
यंदा २० नोव्हेंबरपासून विवाहासाठी मुहूर्त सुरू झाले असून जूनपर्यंत हे मुहूर्त चालणार आहेत. म्हणजेच आठ महिन्यांच्या काळात ४६ लग्नतिथी आहेत. मे २०२१ महिन्यात सर्वाधिक मुहूर्त असल्याने हा महिना लग्नाच्या धामधुमीचा ठरणार आहे. दिवाळी सण झाल्यानंतर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो. यावर्षी डिसेंबर महिन्यापासून गुरूचा अस्त राहणार असल्यामुळे महिनाभर शुभमुहूर्त राहणार नसल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.
यावर्षी नोव्हेंबर महिन्यात चार विवाहाचे मुहूर्त होते. तर डिसेंबर महिन्यात सात मुहूर्त असल्याचे आतापासूनच वधू – वर पित्याची लगीनघाई सुरू झाली आहे. गतवर्षी गुरूचा मिन अस्त असतानाही ८६ मुहूर्त होते. मात्र, यावर्षी गुरूचा अस्त लग्नसराईत आल्यामुळे ४६ मुहूर्त आले आहेत. यंदा कर्तव्य असणाऱ्या घरांत इतर सणांपेक्षा लगीनघाई बघायला मिळणार आहे. यंदाच्यापेक्षा गेल्यावर्षी मुहूर्त अधिक होते. मात्र करोनामुळे लॉकडाऊन झाल्याने अनेकांना विवाह सोहळे रद्द करावे लागले. त्यात यंदाच्या वर्षांत गतवर्षीपेक्षा मुहूर्त कमी असल्यामुळे गेल्यावर्षी रद्द झालेले विवाह सोहळे आणि यंदा कर्तव्य असलेले यामुळे विवाह सोहळे जादा असण्याची शक्यता आहे.