न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ११ डिसें) :- राज्यसभेतील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निकालानंतर भाजपसाठी चिंतेची स्थिती असल्याचे मत व्यक्त केले आहे. भाजपची सत्ता राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये जाईल, असा माझा अंदाज होता. पण काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये घेतलेली झेप पाहता भाजपसाठी २०१९ च्या निवडणुकीत चिंताजनक परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
काकडे म्हणाले, की विकासाचा मुद्दा सोडून पक्षाने इतर बाबींवर या निवडणुकीत लक्ष दिले. त्यात राम मंदिर मुद्दा, शहरांचे नामकरण, हनुमानाची जात काढणे असे प्रकार झाले. मतदारांवर त्याचा नकारात्मक परिणाम झाला. राजस्थानमध्ये मी निवडणुकीआधी सर्वेक्षण करण्यासाठी गेलो होतो. तेथील सरकारबद्दल नाराजी होती. हे लक्षात आले होते. मात्र, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस २५ जागांवरून शंभऱच्या पुढे जाईल, असे वाटले नव्हते. येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाळे आहे. भाजपची बूथपर्यंत यंत्रणा आहे. चौहान सरकारबद्दल सहानुभूती होती. तरी जनतेने काँग्रेसला दिलेला पाठिंबा महत्त्वाचा आहे.
६५ खासदार या तीन राज्यांतून निवडून जातात. यापैकी ६२ हे भाजपचे आणि काँग्रेसचे फक्त तीन खासदार आहेत. २०१४ चा मोदींचा विकासाचा अजेंडा जातीपातीचे राजकारण केल्यामुळे मागे पडला. ही स्थिती अशीच राहिली तर २०१९ साठी धोक्याची घंटा ठरेल. पक्षाने या परिस्थितीचा गंभीरतेने विचार करायला हवा. मी पक्षाचा खासदार म्हणून नाहीतर एक निवडणूक विश्लेषक म्हणून हे सांगत असल्याचा खुलासाही त्यांनी केला.












