- सर्व राजकीय पक्ष, कामगार संघटनांचे पालिका प्रवेशव्दारावर आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२०) जीएसटी कायद्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना निधीसाठी केंद्र सरकारवर अवलंबून रहावे लागते. महाराष्ट्राच्या वाट्याचा जीएसटीचा परतावा २८ हजार कोटी रुपये मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करायला हवेत. त्याऐवजी फडणवीस राज्यातील जनतेला पीएम केअर फंडात पैसे देण्यासाठी आवाहन करतात. महाराष्ट्रातील जनतेच्या कष्टाचा पैसा महाराष्ट्रात विकासासाठी वापरला जावा. ही मागणी असताना फडणवीस मात्र, महाराष्ट्र द्रोह करुन केंद्र सरकारचा उदो उदो करत आहेत. अशा महाराष्ट्र द्रोही फडणवीस यांचा तसेच शेतक-यांविषयी निंदाजनक वक्तव्य करणा-या केंद्रीय मंत्री पियुष गोयल व रावसाहेब दानवे यांचा कामगार नगरीतील नागरिक तीव्र निषेध करीत आहेत. असे प्रतिपादन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी मागील पंधरा दिवसांपासून दिल्लीत कोट्यावधी शेतकरी आंदोलनास बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच शेतक-यांविषयी निंदाजनक वक्तव्य करणा-यांचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि. १४ डिसेंबर) पिंपरी चिंचवड शहरातील सर्व राजकीय पक्ष, पुरोगामी संस्था व कामगार संघटना संयुक्त समितीच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशव्दारावर आंदोलन करण्यात आले.
यावेळी कामगार नेते इरफान सय्यद, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, समन्वयक मानव कांबळे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ते फजल शेख, राष्ट्रवादी युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, एनएसयुआयचे शहराध्यक्ष वसिम इनामदार, कामगार नेते दिलीप पवार, अनिल रोहम, प्रदीप पवार, धर्मराज साळवे, विशाल जाधव, निरज कडू, संजय गायके, युवराज दाखले, गिरीष वाघमारे, जनार्धन पोलकडे, प्रविण जाधव, सचिन देसाई आदी उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रावसाहेब दानवे आणि पिंपरी चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांच्या प्रतिमेस जोडे मारुन निषेधाच्या घोषणा दिल्या. आंदोलनानंतर महापौर माई ढोरे आणि पक्षनेते नामदेव ढाके यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात उपमहापौर घोळवे यांनी शेतकरी व कामगारांची जाहिर माफी मागावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
डॉ. कैलास कदम म्हणाले की, सीएसआर फंड देखील पीएम केअर फंडात वर्ग करण्याचा नविन पायंडा मोदी सरकारने सुरु केला आहे. प्रतक्षात सीएसआर फंड हा कंपनी ज्या भागात आहे त्या भागातील सार्वजनिक सोयी सुविधा, पाणी, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, दिवाबत्ती, समाज मंदिरे विकसित करण्यासाठी वापरला जावा हे अभिप्रेत आहे. श्रमिकांच्या घामाच्या या पैशावर देखील भाजप सरकारचा डोळा आहे. पिंपरी चिंचवड शहर हे स्थानिक शेतक-यांच्या त्यागामुळे आणि कामगारांच्या कष्टामुळे उभी राहिलेली कामगार नगरी आहे. पंतप्रधान मोदी यांचे सरकार मात्र, शेतकरी आणि कामगार यांना कायमचेच उध्वस्त करण्याचे षडयंत्र रचत आहे असा आरोप डॉ. कैलास कदम यांनी केला.
शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले कायदे मागे घ्यावेत यासाठी दिल्लीत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला गालबोट लावण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि रावसाहेब दानवे हे शेतक-यांचा अवमान करणारी वक्तव्य करुन आंदोलन कर्त्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्रीय मंत्री गोयल व दानवे यांचीच ही निंदाजनक वक्तव्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी सर्व साधारण सभेत उच्चारली. उपमहापौर घोळवे याबाबत जाहिर माफी मागावी तसेच सभेतील त्यांचे वक्तव्य कामकाजातून वगळावे अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर यांनी केली.
समन्वयक मानव कांबळे तसेच मारुती भापकर, प्रशांत शितोळे यांनी देखील केंद्र सरकारचा व उपमहापौर घोळवे यांचा निषेध करणारी भाषणे केली.














