- बाधित शेतकऱ्यांचे उद्या गुरुवारी जेलभरो आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२१) :- दिघी, भोसरी, बोपखेल व कळस येथील शेतकऱ्याच्या एकूण १ हजार २३२ एकर जमिनीचे अवार्ड न करता तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या जमिनी ताब्यात घेतल्या. आजपर्यंत या जमिनींची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली नाही. याचा पूर्ण निवाडा व मोबदला शेतकऱ्यांना दिला गेला नाही. या जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व आपल्या न्याय मागण्यांसाठी या भागातील बाधित शेतकरी गुरुवारी (दि. २५) जेलभरो आंदोलन करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष बबन बाळके यांनी दिली.
दिघी, भोसरी, बोपखेल व कळस येथील जमिनी सन १९२५ साली पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी अवार्ड न करता ताब्यात घेतल्या. या जमिनी ताब्यात घेताना त्यांनी फक्त गॅझेट नं. ३७२२ / २४ चा आधार घेतला. त्या जमिनींचा नाही आजपर्यंत पूर्ण निवाडा झाला नाही शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. याउलट वारंवार त्या जमिनीचे फेरफार करून एका खात्याकडून दुसऱ्या खात्याकड या जमिनी परस्पर वर्ग करण्यात आल्या.
आता याच जमिनीचा टाटा कम्युनिकेशन दिघी यांनी विदेश संचार निगम लिमिटेड यांच्या नावाचा ७/१२ कंपनी कायद्याअंतर्गत बदल करून टाटा कम्युनिकेशन यांच्या नावे फेरफार जमीन ताब्यात घेतल्या आहेत. याबाबात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे काय झाले याची शेतकऱ्यांना पुसटशीदेखील कल्पना नाही. आता हीच जमीन पुन्हा एकदा चर्चेत आली असून, टाटा कम्युनिकेशनचे २६.१२ टक्के हिस्सा केंद्र सरकारने विक्रीस काढली आहे. यातून केंद्र सरकारला तब्बल आठ हजार कोटी रुपये उपलब्ध करता येणार असल्याची अपेक्षा सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे.
टाटा कम्युनिकेशनमधील काही भाग टाटा उद्योग समूहाला विकली जाणार असून, या जमिनीची ३ फेब्रुवारी रोजी बोली व लिलाव पद्धतीने करण्यात आली. तर २० मार्चपर्यंत हा संपूर्ण व्यवहार पूर्ण करण्याचा सरकारचा विचार आहे. सरकार याबाबत जमिनी भूसंपादन कायद्याचे उल्लंघन करीत असून, या भागातील शेतकरी कुटुंबे केंद्र सरकार, राज्य सरकार व टाटा कम्युनिकेशन यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी व शेतकऱ्याना आपल्या जमिनीचा योग्य तो मोबदला मिळण्यासाठी गुरुवारी (दि. २५) सकाळी दहा वाजता टाटा कम्युनिकेशन दिघी यांच्या गेटसमोर जेलभरो आंदोलन करणार आहेत.