न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसें.) :- राठी कुटूंबातील चार भावंडांनी एकत्र येवून आळंदी येथील राष्ट्रीय दृष्टीहीन संघ संचलित जागृती अंध मुलींच्या शाळेच्या बांधकामासाठी तब्बल २४ लाख २५ हजाराची देणगी देवून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
सूर्यकांत राठी, श्रीनिवास राठी, दिलीप राठी, सुनील राठी असे या चार भावंडांची नावे आहेत. जागृती शाळेत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात २४ लाख २५ हजारपैकी १४ लाख २५ हजाराचा धनादेश दिला आहे. महिनाभरत उर्वरीत १० लाखाचा धनादेश देण्यात येणार असल्याचे श्रीनिवास राठी यांनी सांगितले. राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, प्रवक्त्या सकीना बेदी, समन्वयक गजानन मगर यांनी हा धनादेश स्वीकारला.
श्रीनिवास राठी म्हणाले कि, आम्ही गेली १० वर्षांपासून जागृती अंध शाळेच्या संपर्कात असल्याने त्यांचे कार्य जवळून पाहिले. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ अंध मुलींसाठी एक भव्यदिव्य शिक्षण-कौशल्य सेंटर उभारण्यासाठी धडपड करीत आहे. या इमारतीचे अर्धे बांधकाम झाले असून, अर्धे बांधकाम पूर्ण करण्यासाठी या संघास खूपच पैशाची गरज आहे. हे ओळखून आम्ही चौघांनी देणगी देण्याचा निर्णय घेतला. भोसरीत असलेल्या लघु उद्योगातून हा निधी दिला. शहरातील अनेक देणगीदारांनी पुढाकार घेउन या अंध शाळेस मदत करावी, असे आवाहन केले आहे.
अंध शाळेच्या प्रवक्त्या सकीना बेदी म्हणाल्या कि, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र संचलित जागृती अंध मुलींच्या शाळेत ११० विद्यार्थीनी शिकत आहेत. त्यांची निवास, भोजन संपूर्ण व्यवस्था आम्ही करतो. १९८९ साली स्थापना केलेल्या या संस्थेचे कार्य पाहुन महाराष्ट्र शासनाने आळंदीत मरकळ रोड लगत २ एकर जागा दिली. त्या जागेत काही समाजसेवी संस्था आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सहकार्याने सुमारे ३ कोटी खर्चाचे अर्धे बांधकाम झाले.
अपुऱ्या बांधण्यात आलेल्या इमारतीत अंध मुलींची शाळा सुरू केली. शाळेशेजारी उभारण्यात येत असलेल्या “करियर ओरीएंटेड एज्युकेशन कॅंपस फॉर द ब्लाइंड” या वसतिगृहाचे बांधकाम हे निधी अभावी थांबलेले आहे. आमच्या आवाहनाला साद देत राठी कुटुंबीयांनी अगदी संकटकाळी आर्थिक मदत केली. या निधीमुळे थांबलेले बांधकाम सुरू करता येणार आहे. पूर्ण प्रकल्प उभारणीसाठी पावणेसात कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी अर्धा पल्ला गाठला आहे. शाळेला आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. बांधकामासाठी एक विट दिली तरी आमच्यासाठी अमूल्य मदत आहे. तर दानशूर व्यक्तींनी आर्थिक किंवा वस्तुरूपात सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन करीत महाराष्ट्रातील सर्व अंध मुलींना आमच्याकडे मोफत सर्व सुविधा दिल्या जातील, असे सांगितले आहे.