न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२१) :- चिंचवड येथील विकास शिक्षण मंडळाचे संस्थापक – अध्यक्ष रामचंद्र सावळाराम जाधव ऊर्फ आण्णासाहेब जाधव यांचे मंगळवार दि. १३-०४-२०२१ रोजी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. आण्णासाहेबांच्या रुपात शिक्षण क्षेत्रातील एक अनमोल व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड हरपले आहे. १९८४ साली चिंचवड येथे त्यांनी शाळा सुरु केली आणि श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय, श्रीमती सी. के. गोयल प्राथमिक विद्यालय, श्रीमती के. जे. गुप्ता ज्युनिअर कॉलेज व श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे बालक मंदिर अशा विविध विभागांतून सर्वसामान्यांच्या मुलांसाठी दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
परिस्थितीमुळे स्वत: अल्पशिक्षित असलेल्या आण्णांसाहेबांना नोकरीत प्रमोशन मिळाले नाही आणि त्यांच्यापेक्षा ज्युनिअर असलेल्या व्यक्तीला प्रमोशन देण्यात आले. अशी वेळ पिंपर-चिंचवड MIDC मधील कामगारांच्या मुलांवर येऊ नये म्हणून आण्णांसाहेबांनी शाळेची निर्मिती केली. अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण अशा भूगोल प्रयोगशाळा, इंग्लिश विषयाची प्रयोगशाळा, गणित प्रयोगशाळा, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीस चालना देणारे सायन्स सेंटर, संस्कृत विषयाची प्रयोगशाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरिता सायन्स, गणित व भूगोल कक्ष अशा विविध मॉडेल्सयुक्त अत्याधुनिक प्रयोगशाळांची निर्मिती आण्णांसाहेबांनी विद्यार्थ्यांच्या सुलभ आकलनाकरिता केली.
भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, चेन्नई, केरळ, आंध्रप्रदेश, गुजरात, पंजाब, दिल्ली अशा विविध राज्यांत तसेच मुंबई, भोपाल, बँगलोर येथे
विद्यालयातील गणित, विज्ञान, भूगोल विषयांच्या शिक्षकांना प्रशिक्षणाकरिता आणि मॉडेल्स खरेदीकरिता पाठविण्यात आले. अशा विविध ठिकाणांहून शालेय अभ्यासक्रमवार आधारित अनेक मॉडेल्सची माहित मिळवून त्यांची खरेदी तसेच काही मॉडेल्सची निर्मिती केली गेली. त्यामुळे अध्ययनातील अवघड वाटणारा घटक विद्यार्थ्यांना या मॉडेल्सच्या सहाय्याने सोपा वाटू लागला आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत आमूलाग्र प्रगती झालेली आढळली.
पिंपरी चिंचवड परिसरात शिक्षण क्षेत्रात आण्णांसाहेबांनी आमुलाग्र प्रगती साधलेली असून एच.एस.सी. व एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत दरवर्षी विद्यालयाचा निकाल १०० % असा दणदणीत लागतो आणि अनेक विद्यार्थी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तुंग यश संपादन करतात. सन २०१९-२० मध्ये एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत विद्यालयाच्या तब्बल १२४ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत. क्रीडा क्षेत्रातही आण्णांसाहेबांनी अत्यंत आगळावेगळा ठसा निर्माण केलेला आहे. आण्णा स्वत: कुस्ती खेळातील सलग तीन वर्षे महाराष्ट्र CHAMPION होते.
पिंपरी-चिंचवड मध्ये आर्चरी, रायफल शूटिंग, जिम्नॅस्टिक्स, लाकडी मल्लखांब, रोप मल्लखांब यांसारख्या खेळांची सर्वप्रथम सुरुवात आण्णांनी केली होती आणि आज विद्यालयाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत. विद्यालयातील अनेक विद्यार्थी विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये दरवर्षी यशस्वी कामगिरी करतात. विद्यालयाच्या खेळाडूंनी आत्तापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय, ६० राष्ट्रीय, सुमारे ६५० राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेले आहे. विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि पालक यांच्या शुभेच्छा सदैव आण्णांसाहेबांच्या पाठीशी होत्या.
आण्णांसाहेबांच्या या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील महान योगदानाची दखल घेत शासनाने त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, अनेक शिक्षणाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या हस्ते शिक्षणभूषण, विद्याभूषण, शिक्षणमहर्षी असे अनेक पुरस्कार देऊन आण्णांसाहेबांना वेळोवेळी सन्मानित केलेले होते.
अहमदाबाद येथील ISRO संस्थेचे अनेक शास्त्रज्ञ, भारतातील प्रसिद्ध उद्योजक श्री. रतनजी टाटा, महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी, अनेक शिक्षणतज्ज्ञ तसेच साधूसंतांनी वेळोवेळी विद्यालयाला भेटी दिलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अनेक शाळांतील संस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विद्यालयाला भेटी देऊन विद्यालयातील नवोदित उपक्रमांची माहिती घेत असतात. शिस्तप्रिय आणि प्रेमळ असे व्यक्तिमत्व असलेले आण्णासाहेब हे विद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचे आणि पर्यायाने समाजाचे एक आदर्श मार्गदर्शक होते. स्वत:च्या सर्व सुखांचा त्याग करून अण्णांनी हे संस्थेच्या रूपातील रोपटे लावले, सजवले, फुलवले आणि नावारूपाला आणले. विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या यशाच्या रुपाने आण्णा सदोदित अमर राहतील.
आण्णासाहेबांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, जावई, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे. आण्णासाहेबांच्या कर्तृत्वाचा झरा असाच अखंड वाहत राहो, त्यांच्या सर्व कुटुंबियाना आणि आप्तेष्टांना या दु:खातून सावरण्यास शक्ती लाभो आणि आण्णासाहेबांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच मनापासून प्रार्थना !