- स्थायीकडून दखल; पवनेच्या पाण्यासाठी शहरवासीयांना मात्र, प्रतीक्षाच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२१) :- पवना जलवाहिनी प्रकल्पाला विरोध करताना पोलिस गोळीबारात जखमी झालेल्या १२ शेतकऱ्यांच्या वारसांना, नातेवाईकांना पिपरी चिंचवड महापालिका सेवेत घेण्यात येणार आहे. याबाबतची उपसूचना स्थायी समितीने दाखल करून घेतली आहे. महासभेने जरी हा प्रस्ताव मंजूर केला. तरी, राज्य सरकारची अंतिम मान्यता लागणार आहे.
पवना जलवाहिनी प्रकल्पाचे काम २००८ मध्ये सुरु होताच या प्रकल्पाला मावळातील नागरिकांनी विरोध केला. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर प्रकल्पाविरोधात ९ ऑगस्ट २०११ रोजी झालेल्या आंदोलनाच्यावेळी झालेल्या गोळीबारात कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, श्यामराव तुपे यांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर काम बंद करण्यात आले ते आजतागायत बंदच आहे. गोळीबारात मृत्यू झालेले मृतांचे वारसदार नितीन ठाकर, अक्षय साठे आणि हौसाबाई तुपे यांची अनुक्रमे शिपाई आणि मजूर म्हणून २०१५ मध्ये महापालिका सेवेत नियुक्ती करण्यात आली.
गोळीबारात जखमी झालेल्या १२ शेतकऱ्यांचे वारस असलेल्या योगेश तुपे, शिवाजी वरवे, अमित दळवी, विशाल राऊत, गणेश चौधरी, नवनाथ गराडे, गणेश तरस, तुकाराम दळवी, अनिकेत खिरीड, गोरक्षनाथ वरघडे, गणपत पवार आणि सुरेखा कुडे या १२ जणांना महापालिका सेवेत घेण्याची उपसूचना स्थायीने मांडली आहे. मान्यतेसाठी महापालिका सभेकडे शिफारस केली आहे. महासभेनंतर राज्य सरकारची अंतिम मान्यता घ्यावी लागणार आहे.