भलतेच कारण देत प्रस्ताव दप्तरी दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६. मे. २०२१) :- डिसेंबरपर्यंत भामा आसखेडचे पाणी शहरात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असताना पाणीपुरवठा प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत एकाच ठेकेदाराला काम दिल्यास दिरंगाई होईल. त्याऐवजी कामाचे तुकडे करा, विगवेगळ्या ठेकेदारांना कामे द्या, असे आदेश स्थायी समितीने आयुक्तांना दिले आहेत.
जेएनएनयूआरएम अंतर्गत ४० टक्के भागासाठी २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचे काम सुरू आहे. तसेच अमृत अभियानांतर्गत उर्वरित ६० टक्के भागामध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे, याप्रकल्पाचे काम चार ठेकेदारांमार्फत चार वेगवेगळ्या टप्प्यांत सुरू आहे. यामुळे पाणीगळती कमी होऊन पाण्याच्या उपलब्धतेमध्ये वाढ होणार असल्याचा आयुक्तांनी सांगितले होते. आयुक्त राजेश पाटील यांनी या कामांची निविदा स्वीकारण्यास २३ मार्चला मान्यता दिली. स्थायी समितीच्या विषयपत्रिकेवर प्रस्ताव होता. विषय दप्तरी दाखल केला आहे.
पाणीपुरवठा प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत वाकड, थेरगाव, भोसरीतील सेक्टर ७ आणि २० मध्ये तसेच भोसरी परिसरात नवीन पाण्याच्या टाक्या बांधणे जलवाहिनी टाकणे तसेच शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पंपिंग व्यवस्था कार्यान्वित करणे अशी विविध कामे करण्यात येणार आहेत. महापालिका पाणीपुरवठा विभागाच्यावतीने या कामासाठी निविदा मागवल्या. निविदा दर ६४ कोटी ६५ लाख ८२ हजार रुपये निश्चित केला. तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये गुडविल कन्स्ट्रक्शन यांनी निविदा दरापेक्षा ३.४९ टक्के जादा दर सादर केला. म्हणजेच ६६ कोटी ८० लाख ५५ हजार रुपये अधिक रोयल्टी चार्जेस २ लाख ३२ हजार आणि मटेरियल टेस्टिंग चार्जेसपोटी ८ लाख २३ हजार रुपये असे एकूण ६६ कोटी ९१ लाख २० हजार रुपये खर्च होणार आहे.
एकाच बड्या ठेकेदाराला कंत्राट बहाल केले की, तो कोणत्या ना कोणत्या कारणाने विलंब लावेल. काम रखडेल. त्याऐवजी मोठ्या कामाचे विभाजन केल्यास काम जलदगतीने संपेल. पाणीपुरवठ्याचा प्रकल्प लवकर मार्गी लागेल. त्यामुळे प्रस्ताव दफ्तरी दाखल केला आहे. अल्पमुदतीची निविदा प्रसिद्ध करण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत.
-नितीन लांडगे, सभापती स्थायी समिती…