- शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करावा; देहू संस्थानची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. जून २०२१) :- संत तुकाराम महाराजांच्या पालखीसह मानाच्या ९ पालख्यांना आषाढी पायी वारीसाठी परवानगी न देता शासनाने मानाच्या दहा पालख्यांना मोजक्याच भाविकांसह बसने जाण्यास परवानगी दिलेली आहे. ती वारकऱ्यांसाठी क्लेशदायक व दु:ख देणारी आहे. आम्ही आजही पायी वारी करण्यावर ठाम असून, शासनाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा.
शासनाच्या या निर्णयावर संस्थानसह तमाम वारकरी व भाविकांची नाराजी असल्याचे मत श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी व्यक्त केले.
पायी वारीबाबत शासनाने नेमकी कशी परवानगी दिलेली आहे. या निर्णयाची अधिकृत प्रत संस्थानला प्राप्त झाल्यानंतरच संस्थानची भूमिका अधिक स्पष्ट करता येईल. असे असले तरी शासन जी मार्गदर्शक तत्त्वे घालून देतील, त्याचप्रमाणे हा पालखी सोहळा करण्यात येईल, अशी भूमिका संस्थानची असेल, असे मोरे यांनी सांगितले.
तुकाराम महाराजांच्या ३३६ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान १ जुलै रोजी श्रीक्षेत्र देहगाव येथून दुपारी २ वाजता होणार आहे. वाखरी ते पंढरपूर दीड किलोमीटर अंतर पायी जाण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र, याबाबत आणखी काय निर्बंध आहेत, याबाबत अधिकृत मिळाल्यानंतरच सोहळ्याचे स्वरूप त्याचे नियोजन करावे लागेल. आम्ही शासनाला ही गौरवशाली परंपरा जतन करण्यासाठी विविध पर्याय दिलेले होते. रात्रीचा प्रवास करून पालखी नेऊ, पालखीचा देहू ते पंढरपूर हा १५ दिवसांचा प्रवास केवळ १० दिवसांत पूर्ण. शासनाने हा दुर्दैवी निर्णय घेऊन ही संधी गमावली असल्याची खंत संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी सांगितले. या वेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख भानुदास मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, संतोष महाराज, विशाल माणिक महाराज मोरे व आदी उपस्थित होते.