- राष्ट्रवादीच्या संजोग वाघेरेंचे आयुक्तांना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२१) :- मावळमधील पवना धरण व मुळशी धरण क्षेत्रात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. धरणातील पाण्यासाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. पावासाच्या पाण्यामुळे पवना, मुळा नद्या ओसंडून वाहत आहेत. धरण भरल्यानंतर आणखी अतिरिक्त पाणी नदीत सोडले जाते. नदी पात्रातील पाणी पातळी सतत वाढत असल्यामुळे नदी पात्रालगतच्या रहिवाशांना पुराचा धोका निर्माण झालेला आहे, त्यासाठी पालिका आयुक्तांनी खबरदारी म्हणून तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दोन वर्षापूर्वी आलेल्या पुरात शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पवना नदीकाठच्या चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, पिंपळे गुरव, रहाटणी, काळेवाडी आणि मुळा नदीकाठच्या वाकड, पिंपळे निलख, दापोडी, बोपखेलमधील नदीजवळच्या नागरिकांना पुरामुळे धोका होऊ शकतो. पुराचा सर्वाधिक फटका पिंपरी, सांगवी परिसरातील रहिवाशांना बसतो. तरी वर्षी पुरपरस्थिती निर्माण होऊ नये. शहरात कोणतीही दुर्घटना घडणार नाही. यासाठी महानगरपालिका प्रशासनाने दक्षता घ्यावी.
पवना, मुळा नदीपात्रापासून जवळच्या भागात महानगरपालिकेच्या कामांसाठी खोदलेले रस्ते, राडारोडा सुव्यवस्थित करावा. अशा ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी अशा कामांच्या ठिकाणी विशेष खबरदारी घेतली जावी. यासह महानगरपालिकेच्या संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना यांच्या सर्व ती खबरदारी घेण्याचे निर्देश द्यावीत. पुरामुळे स्थलांतरित कराव्या लागणाऱ्या नागरिकांची योग्य सोय करावी. कोणताही निष्काळजीपणा होणार नाही. याची योग्य दक्षता प्रशासकीय यंत्रणेने घ्यावी व तातडीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे या पत्रात वाघेरे यांनी म्हटले आहे.