- नागरवस्तीच्या विधवा अर्थसहाय्य योजनेत पंधरा हजारांची वाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२१) :- कोरोनामुळे कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमावल्याने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा विधवा झालेल्या महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने महापालिकेने एक पाऊल उचलले आहे. नागरवस्ती विभागाकडील विधवा अर्थसाह्य योजनेत १० हजारांऐवजी २५ हजार रुपये अर्थसाह्य देण्यात येणार आहे.
याविषयावर महापालिका सभेत चर्चा झाली. अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते. नागरवस्ती विकास योजना विभागाकडून महिला आणि बालकल्याण योजनअंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्या अंतर्गत विधवा महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी विधवा अर्थसाह्य योजनेतून १० हजार रुपये अर्थसाह्य दिले जात होते. त्यामध्ये १५ हजार रुपयांनी वाढ करून २५ हजार इतके अर्थसाह्य दिले जाणार आहे.
त्यासाठी अर्जदाराने अर्जासोबत आधारकार्ड जोडावे. मतदार ओळखपत्र किंवा मतदार यादीची प्रत या दोन्हीपैकी एक पुरावा जोडावा. पतीच्या मृत्यू दाखल्याची प्रत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पतीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे. वार्षिक उत्पन्न २ लाखांपर्यंत असल्याबाबतचा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्डची प्रत जोडावी. महिलेचे वय ५० पर्यंत असावे. अर्जदार महिलेने यापूर्वी विधवा किंवा घटस्फोटित महिलांना किरकोळ स्वरुपाचा व्यवसाय करण्यासाठी या योजनेचा लाभ घेतला असल्यास लाभाची रक्कम १५ हजार रुपये मिळेल.