- सियाझ, एर्टिगा, विटारा ब्रेझा, एस-क्रॉस, एक्सएल ६ या वाहनांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ सप्टेंबर २०२१) :- मारुति सुझुकी एक लाख ८१ हजार गाड्या परत मागवणार आहे. मारुति सुझुकी इंडिया लिमिटेडने शुक्रवारी यासंदर्भात घोषणा केली.सियाझ, एर्टिगा, विटारा ब्रेझा, एस-क्रॉस आणि एक्सएल ६ च्या काही पेट्रोल व्हेरियंट्स गाड्या परत मागवणार आहे.
या सर्व मॉडेल्सट्या गाड्या ४ मे २०१८ ते २७ ऑक्टोबर २०२० दरम्यान तयार केलेल्या आहेत. या मॉडेल्सच्या १ लाख ८१ हजार ७५४ युनिट्समध्ये संभाव्य त्रुटींची तपासणी केली जाणार असल्याचं कंपनीनं सांगितलंय. मारुतिने जागतिक स्तरावर रिकॉल मोहीम हाती घेतली असून या सर्व गाड्यांमध्ये सुरक्षेसंदर्भात त्रुटी असू शकतात, असंही म्हटलंय.
“ग्राहकांच्या हितासाठी, मारुति सुझुकीने मोटार जनरेटर युनिटची तपासणी करून मोफत रिप्लेसमेंट किंवा वाहनं पुर्णपणे बदलून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्रुटी असलेल्या वाहन मालकांना मारुति सुझुकीच्या अधिकृत वर्कशॉप्समधून कळवण्यात येईल. शिवाय त्रुटी असलेल्या पार्ट्सची रिप्लेसमेंट करण्याचं काम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. वर नमूद केलेल्या मॉडेल्सची वाहनं ज्यांच्याकडे आहेत, त्यांनी ती पाण्यामध्ये चालवू नये आणि वाहनांमध्ये इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक भागांवर थेट पाण्याची फवारणी करणं टाळावं,” अशी विनंती कंपनीने ग्राहकांना केली आहे.