- पालिका व प्राधिकरण नागरी कृती समितीकडून भक्ती शक्ती चौकात नक्षत्र वृक्षांची लागवड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने भक्ती शक्ती चौक परिसरात नक्षत्र वृक्षांची लागवड करून वृक्ष संवर्धन मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
निगडी पोलीस ठाणे, चिंचवड पोलीस ठाणे, पिंपरी पोलिस ठाणे, चिंचवड मोरया गोसावी संस्थान मंदिर आणि प्राधिकरण परिसरात उंबर, कडुलिंब, बकुळ, अर्जुन, आवळा, पिंपळ, वड, आंबा, खैर, जांभूळ या ७५ नक्षत्र वृक्षांची लागवड करण्यात आली. त्याचप्रमाणे बांबू, पारिजातक या देशी कल्पवृक्षांचीही लागवड करण्यात आली.
या प्रसंगी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक सचिन चिखले, वृक्ष प्राधिकरण सदस्य हिरामण भुजबळ, पोलीस निरीक्षक सत्यजित खुळे, भोजराज मिसाळ, सहा. पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर, पोलीस उपनिरीक्षक दयानंद देवकाटे, शिवाजी नागरकोजे, भगवान नागरगोगे, स. पो. उप. नि. दत्तात्रय कांबळे, किसन शिंदे, पालिका उद्यान अधिकारी ज्ञानेश्वर कांबळे, मोरया गोसावी चिंचवड देवस्थान च्या श्रीमती वैजयंती वाघमारे, पालिका स्मार्ट सिटी समन्वयक अमोल देशपांडे, समिती अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत उपस्थित होते.
सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ” स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचा सहभाग व ७५ नक्षत्र वृक्षारोपणाचा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. आयुर्वेद व देशी झाडांची संख्या विदेशी झाडांच्या तुलनेत शहरात वाढली पाहिजे. त्याकरिता शहरातील उद्यानांमध्ये देशी वृक्ष लागवडही येत्या काळात मोठ्या प्रमाणात केली जाईल.
नगरसेवक सचिन चिखले म्हणाले, “स्मार्ट सिटीच्या प्रमुख प्रकल्पामध्ये ‘भक्ती शक्ती उड्डाण पूल प्रकल्प’ हा शहराचा मानबिंदू ठरला आहे. भविष्यात मेट्रो सुद्धा निगडीपर्यंत धावणार यात शंका नाही. नक्षत्र वृक्ष लागवडीमुळे भक्ती शक्ती चौक आता यापुढे हरित चौक म्हणूनही नावलौकिकास येणार आहे. समितीच्या उपक्रमाचे नक्कीच स्वागत व अभिनंदनही.”
पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ म्हणाले, “देशी नक्षत्र वृक्षारोपणामुळे शहराच्या वातावरणातील प्रदुषण नक्कीच कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे ऑक्सिजनची पातळीही वाढेल. शहर पोलीस विभाग अश्या या विधायक सामाजिक उपक्रमात नक्कीच सहभागी असेल.
सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर म्हणाल्या,” आयुर्वेदिक वृक्षांचे महत्व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनन्य साधारण आहे. आधुनिक वैदयकीय क्षेत्रात औषधी उपयोगाकरिता नक्षत्र वृक्षांचा सद्यस्थितीत मोठा वाटा आहे. शहरात अश्या पद्धतीने प्रत्येक प्रभागात मोठ्या संख्येने वृक्षलागवड करणे आजच्या काळात जास्त गरजेचे आहे.
समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या विळख्यात अनेक नागरिक अडकले. अनेकांना प्राणही गमवावा लागला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवने आता अत्यावश्यक ठरले आहे. याकरिता शहरात वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. समितीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून समिती ७५ नक्षत्र वृक्षांची लागवड करीत आहे.”
अमृत महोत्सवी कार्यक्रमास विशेष सहकार्य व परिश्रम महिला शहराध्यक्षा अर्चना घाळी दाभोळकर, संतोष चव्हाण, विशाल शेवाळे, रामेश्वर गोहिल, बाबासाहेब घाळी, तेजस सापरिया, सुनिल चौगुले, देवजी सापरिया, अजय घाडी, सतीश मांडवे, राजेश बाबर यांनी केले.