- आता माजी नगरसेवक संघटनेची अजित पवारांकडे कूच..
- भेटीसाठी वेळ द्या; जगदीश शेट्टी यांचे अजितदादांना साकडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकतेच शहरात येऊन गेले. जाहीर मेळाव्यात त्यांनी महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या कारभारावर सडकून टीका केली तर, बैठकीत माजी नगरसेवकांनी शरद पवार यांच्याकडे नात्यागोत्यांचे राजकारण थांबवा, अशी मागणी केली. माजी आमदार विलास लांडे, आमदार अण्णा बनसोडे, जेष्ठ नेते आझम पानसरे, माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी पवारांना शहरात आणण्यासाठी ताकद खर्ची केली. पवार यांचा दोन दिवसीय राजकीय झंझावात पाहता पालिका निवडणुकीत तसा अपेक्षित परिणाम निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गत मावळ लोकसभा मतदारसंघातून तीनही वेळा राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पराभवाला आपलीच लोक कारणीभूत आहेत. पार्थ पवारांचा पराभवही त्यामुळेच झाला. सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या कारभाराविरोधात आवाज उठविण्यात पक्षाची शहर कार्यकारिणी कमी पडतेय, अशा तक्रारी या माजी नगरसेवकांनी पवारांकडे केल्या होत्या. या सर्व प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार कुठेच नव्हते. पक्षातील आजी नगरसेवकांचा गट वगळता अजितदादांचे माजी नगरसेवकांच्या गटाकडे दुर्लक्ष होत होत आहे. रुसवे-फुगवे काढण्याची ही वेळ नाही. माजी नगरसेवकांना भेटीसाठी अजितदादांनी वेळ द्यावा, या मागणीसाठी माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी अजितदादांची मंगळवारी (दि. १९) मुंबईत भेट घेतली. त्यांना मागणीचे निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आझमभाई पानसरे उपस्थित होते.
अजितदादांना दिलेल्या निवेदनात जगदीश शेट्टी यांनी म्हटले आहे की, पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका माहे फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहेत. महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा यावी, अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे. सन २०१७ च्या पालिका निवडणूकीत आताचे सत्ताधारी व पोलिसांच्या राजकारणामुळे आपले बहुसंख्य उमेदवार अल्पमताने पराभूत झाले आहेत. सार्वत्रीक निवडणूकीच्या अनुषंगाने या माजी नगरसदस्यांना सक्रीय अनं एकत्रित करण्याची गरज निर्माण होत आहे. त्यासाठी आतापासूनच काम सुरु होण्याची गरज आहे. त्यासाठी पक्षाच्या माजी नगरसदस्यांची बैठक लवकर होणे क्रमप्राप्त ठरते. काही निवडक माजी नगरसदस्य आपणाला भेटू इच्छितात. त्यातील ९० टक्के माजी नगरसदस्य पुन्हा निवडून येऊ शकतात, असा दावा शेट्टी यांनी या निवेदनात केला आहे.