- त्या गावांच्या स्वतंत्र ‘नगरपरिषदे’ साठी’ मुंबईत खलबतं.
- शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा आग्रह?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२१) :- हिंजवडीसह सहा गावे मिळून नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेतला जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नुकतीच देण्यात आली आहे. हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, नांदे आणि कासारसाई या गावांचा त्यात समावेश आहे.
या गावांसाठी एकत्रित संयुक्त नगरपरिषद स्थापन करण्याच्या दृष्टीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी (दि. २०) रोजी मुंबईत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत प्राथमिक बैठक झाली. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हाधिकारी आणि पीएमआरडीए यांची मते जाणून घेऊन नगरपरिषद स्थापन करावी किंवा नाही, याबाबतचा सविस्तर अहवाल विभागीय आयुक्त शासनाला सादर करणार आहेत.
हिंजवडीत आयटी पार्क आहे. वरील गावांमध्ये ग्रामपंचायत असल्यामुळे पायाभूत सोयी-सुविधांवर ताण पडतो. त्यामुळे या परिसरांचा सुनियोजित विकास करण्यासाठी या गावांचा पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश करावा, असे चित्र मध्यंतरी उभे केले होते. तशी चर्चा सुरु होती. मात्र ऐनवेळी नगरपरिषद स्थापन करण्याबाबत हालचाली सुरू झाल्यामुळे हा मुद्दा बाजूला पडला आहे. तरीही नेमके काय होईल हे पुढील वर्षी होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निकालावर अवलंबून असेल, अशी माहिती सूत्रांनी ‘न्यूज पीसीएमसी’ला दिली.