संतोष जराड (प्रतिनिधी)…..
- धृतराष्ट्राच्या भूमिकेतून राष्ट्रवादी बाहेर पडणार?
- पालिकेवर ”राष्ट्रवादी पुन्हा” च्या गजरासाठी एका ‘ब्रेक थ्रू’ ची नितांत गरज..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात २०१७ च्या पालिका निवडणुकीनंतर शहर राष्ट्रवादी सर्वच बाबतीत बॅकफुटवर गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी सत्ताधा-यांशी हातमिळवणी करतात, असा आरोप पक्षाचेच जुने-जाणते कार्यकर्ते पक्षश्रेष्ठीपुढे करताना दिसत आहेत. गेल्या साडेचार वर्षात दिवंगत माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने वगळता एकाही विरोधी पक्षनेत्याला सभागृहात स्वतःचा करिश्मा निर्माण करता आला नाही, हे पक्षाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. दररोज सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची कुरणं बाहेर येत असताना केवळ तोंडदेखला विरोधाचा कार्यक्रम करण्याचा सपाटाच प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीने लगावला आहे. दिखाव्यापुरते तासभर आंदोलन केले जाते. नंतर परत कोणी त्याबद्दल अवाक्षरही काढत नाही. त्याचा साधा पाठपुरावाही केला जात नाही. यासाठी खरेच ते बक्षिसपात्र ठरतात.
स्थायी सभापतींच्या लाचखोरीचे आयतेच कोलीत विरोधकांच्या हाती लागले. त्यावरून पिंपरी चिंचवड शहर आणि महापालिकेचं नाव कलंकित झालं. चक्क सभापतींना जेलवारी भोगावी लागली. या मुद्यावरून खुद्द सत्ताधारी भाजप ‘आता आपली सत्ता जातेय की काय?’ या संभ्रमात होती. थेट सत्ताधारी भाजपला सत्तेतून पायउतार होण्यासाठी आव्हान न देता, त्यासाठी कोणत्याही चक्रव्युव्हाची रचना न करता विरोधक राष्ट्रवादी कुंभकर्णगत अवस्थेत राहिली. याउलट सत्ताधारी भाजपने हे प्रकरण अलगद झेलले. ‘तो मी नव्हेच’ या नाटकाला साजेशा घडमोडी रचत, उजळमाथ्याने पुन्हा सभापतींना स्थायीच्या गादीवर आरूढ केले. या सर्व प्रकरणात डोळ्यावर पट्टी बांधून राष्ट्रवादीने धृतराष्ट्राची भूमिका अगदी चोखपणे निभावली. आताही सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आपल्याच पक्षाच्या विरोधात कोकलत असतात. अजूनही या संधीचा फायदा सलग पंधरा वर्षे सत्तेचा गाडा हाकणाऱ्या राष्ट्रवादीला घेता आला नाही, हे स्थानिक नेतृत्वाचे नव्हे तर पक्षाचेच अपयश म्हणावे लागेल. आता महापालिका निवडणूक कशी जिंकू? याचा रोडमॅप तयार करण्याच्या कामात हे स्थानिक नेतृत्व मश्गुल आहे.
गत विधानसभा निवडणुकीत घड्याळाच्या चिन्हावर उभे राहण्यासाठी पक्षाला साधा उमेदवार मिळाला नाही. भोसरी व चिंचवड मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची हिम्मत एकाही नेत्याने दाखवली नाही. उमेदवारीपासून पळ काढला. ऐनवेळी पक्षाला पुरस्कृतची भूमिका घ्यावी लागते. म्हणून की काय भाजपच्या दोन आमदारांच्या विरोधात पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने आत्ताच हात टेकले आहेत. निवडणुकीआधीच या स्थानिक नेत्यांना पक्षाचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी शहरात येऊन कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यावा, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विनंती करावी लागते. खासदार अमोल कोल्हे यांना चक्क पालिकेत लक्ष घालावे लागते. हे स्थानिक नेतृत्वाचे अपयश नव्हे काय? राष्ट्रवादीला मानणाऱ्या शहरातील जाणकार नागरिकांनी याचा काय अर्थ घ्यावा. आताच्या सत्ताधारी भाजपने त्यावेळच्या तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने न केलेला विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती घोटाळा बाहेर काढला अनं सत्ता परिवर्तन केलं. त्याचप्रमाणे विरोधक राष्ट्रवादीला देखील सत्ता परिवर्तनासाठी अशाच एका ‘ब्रेक थ्रू’ ची नितांत आवश्यकता आहे. मात्र, त्यासाठी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या पद्धतीनेच घड्याळाची टीक-टिकदेखील एकसमान यायला हवी. तरच पालिकेवर ”राष्ट्रवादी पुन्हा” चा गजर ऐकायला मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.