न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२१) :- महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने १४ ते २९ नोव्हेंबरपर्यंत राज्यभर जनजागरण अभियान सुरु करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने रविवारी (दि. १४ नोव्हेंबर) रोजी नेहरुनगर येथे देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि महात्मा जोतीराव फुले यांचे आद्यक्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अभियानास सुरुवात करण्यात आली.
त्याअंतर्गत थेरगाव परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचा समारोप थेरगाव येथिल अनुसया मंगल कार्यालयात सभा घेऊन करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव आणि पिंपरी चिंचवड प्रभारी विजय बारसे, महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण सेलचे अध्यक्ष अशोक मोरे, प्रदेश सचिव गौतम आरकडे आदी उपस्थित होते.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी बहुभाषिक, बहुधार्मिक, अखंडप्राय भारत देशाला एकसंध बांधण्याचे काम केले. देशातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू मानुन धोरणे आखली. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच देशात उद्योग कारखाने उभे राहिले. हेच सार्वजनिक उद्योग भांडवलदारांच्या घशात घालून गोरगरीब जनतेला गुलामगिरीत ढकलण्याचे षडयंत्र मोदी, शहा यांचे सरकार करीत आहे, अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली.