- किमान १५ दिवस पुरेल इतक्या अन्नधान्याच्या किटचे कुटुंबियांना वाटप
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२१) :- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे. या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद सुरू केला आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी मानवतेचे दर्शन घडवत तब्बल ५०० हून अधिक कामगारांच्या कुटुंबियांना किमान १५ दिवस पुरेल इतके अन्नधान्य किट वाटप केले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात एसटी कर्मचाऱ्यांनी दि.४ नोव्हेंबरपासून बेमुदत बंद पुकारला आहे. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कामगार प्रतिनिधी आंदोलनाला बसले आहेत. गेले १५ दिवस काम बंद असल्यामुळे एसटी कामगार कुटुंबियांच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे.
गेल्या १५ ते २० दिवसांपासून एसटी कामगार आंदोलन करीत आहेत. सोमवारी वल्लभगर आगारातील सुमारे २०० आणि शिवाजीनगर आगारातील ३०० कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना किमान १५ दिवस पुरेल इतके अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.