- पालिकेने चतुर्थीनिमित्त व्यवसायास प्रतिबंध केल्याने बाबा कांबळे यांचे आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. नोव्हेंबर २०२१) :- मोरया गोसावी देवस्थानला अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी व शेती दिल्या. त्याबदल्यात ठिकाणी त्यांच्या वारसांना व्यवसायाला परवानगी देणे गरजेचे आहे. मात्र त्यांच्यावर व्यवसाय करण्यास बंदी घातली जात आहे. देवस्थानसाठी जमीन देणारे शेतकरी पुत्र आज उघड्यावर असल्याचे प्रतिपादन टपरी पथारी हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले. व्यवसायाला परवानगी मिळत नाही तोपर्यंत लढा चालुच ठेवणार असल्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.
टपरी,पथारी, हातगाडी पंचायत वतीने पथारीधारकांच्या विविध प्रश्नांवर बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी मोरया गोसावी देवस्थान मंदिर ते संबंधित क्षेत्रीय कार्यालयापर्यंत महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता सावळे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग कार्यलयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
यावेळी राजू मिस्कीन, संतोष जव्हेरी, अमर लकेरी, रामनाथ राठोड, इम्तियाज शेख, विजय मटके, ऊलगाजी मटके, ललित कानोजे, परशुराम सिंधगवळी, बाळू गवळी, राजकुमार सिंधगवळी, शांताबाई मटके, मनीषा शिंदगवकी, सुनिता मद्दे, रेखा जवेरी, सीताबाई गवळी, बया शेख, सोनम परदेशी, सलिया शेख, मंगल गवळी, लक्ष्मी मत्के आदी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले की, चिंचवड येथील मोरया गोसावी देवस्थान येथे प्रत्येक चतुर्थीला आणि समाधी सोहळाच्या निमित्ताने पंचक्रोशी परिसरातील पथारी व्यावसायिक या ठिकाणी व्यवसासाठी येतात. त्यामध्ये कटलरी दुकान, शेतीमाल, प्रसाद, भांडार, फुलहार आदींचा समावेश असतो. परंतु सध्या अपुरे रस्ते, वाहतुकीची कोंडी असे कारण सांगून त्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव केला जात आहे. त्यांच्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे.
मोरया गोसावी देवस्थानसाठी येथील शेतकऱ्यांनी स्वमालकीच्या जमिनी, शेती दान दिल्या. पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतेक भागांमध्ये मोरया गोसावी यांच्या देवस्थानच्या नोंदणी दिसून येते. या मध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचे विविध माध्यमातून समोर आले आहे. जमिनीच्या व्यवहारांमध्ये अनेक लोक गब्बर झाले. परंतु ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, त्यांचे वारसदार आज उघड्यावर आहेत. त्या शेतकऱ्यांच्या मुलांना मात्र आता सहा बाय सहाची जागा देखील व्यवसायासाठी मिळत नाही. चतुर्थी निमित्ताने व्यवसाय करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर प्रशासन कारवाई करत आहे. हे अत्यंत खेदाची व अन्यायकारक बाब आहे. त्या विरोधात पुढेही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.