- दहावी-बारावी बक्षीस योजनेला पुन्हा मुदतवाढ; अर्ज करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून इतर कल्याणकारी योजनेमार्फत दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी बक्षीस योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० नोव्हेंबर ही विद्यार्थ्यासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत असणार आहे, अशी माहिती उपायुक्त अजय चारठणकर यांनी दिली.
नागरवस्ती विभागाकडून खासगी शाळांमधील दहावी, बारावीमध्ये ८० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १५ हजारांचे बक्षीस मिळते. दहावीमध्ये ८० टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास १० हजार रुपये तर ९० टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास १५ हजार रुपये बक्षीस देण्यात येते. तर बारावीत ८० टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ हजार रुपये बक्षीस देण्यात येते.
यंदा चालू शैक्षणिक वर्षातील बहुतांश विद्यार्थ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी वारंवार मुदतवाढ देत आहे. तरी विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.