- इच्छुक विद्यार्थ्यांना बक्षिसासाठी अर्ज करण्याचे पालिकेचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून इतर कल्याणकारी योजनेंतर्गत खासगी शाळांमधील दहावी – बारावी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी बक्षीस योजना राबविण्यात येत आहे. मात्र, यावर्षी निकाल व प्रवेश प्रक्रिया लांबल्याने विद्यार्थ्यांना योजनेसाठी अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. परंतु महापालिका प्रशासनाने पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणे बाकी असताना देखील बक्षीस योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गुणवंत विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नागरवस्ती विभागाकडून करण्यात आले आहे.
दहावीत ८० टक्क्यांहून अधिक गुण असणाऱ्याला दहा हजार, तर ९० टक्क्यांहून अधिक गुण असल्यास १५ हजार रुपये बक्षीस दिले जाते. तसेच बारावीत ८० टक्के गुण मिळविल्यास पंधरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते.
करोना महामारीमुळे मागील वर्षापासून दहावी, बारावी प्रवेश प्रक्रिया अथवा इतर शैक्षणिक प्रवेश परीक्षा, निकाल यामध्ये बराच कालावधी गेल्याने बहुतांश गुणवंत विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. बहुतांश गुणवंत विद्यार्थ्याचे प्रवेश बाकी आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून राबविलेल्या बक्षीस योजनेचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येत नव्हता. आतापर्यंत संबंधित विभागाने दोन वेळा मुदतवाढ दिली होती. परंतु तरीदेखील बहुतांश विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे नागरवस्ती विभागाने तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली असून ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाकडून काही अटी चालू शैक्षणिक वर्षासाठी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्याजवळील कागदपत्र जमा करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिका प्रशासनाने चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया न झालेल्या अथवा संबंधित शाळांचा सही, शिक्का नसलेल्या विद्यार्थ्यांना देखील या बक्षीस योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गुणवंत विद्याथ्र्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
– अजय चारठणकर , उपायुक्त – महापालिका…