न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२१) :- कोणत्याही महापुरूषाला जातीच्या चौकटीत न बसविता त्यांचे समाजाला दिलेले योगदान फार महत्त्वाचे आहे. महापुरुषांनी केलेल्या कार्याचे ध्येय ठेवून लहान मुलांवर तसेच विद्यार्थ्यांवर संस्कार झाले पाहिजे असे उद्गार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी काढले.
मातंग विकास संस्था आणि पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आद्यक्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या जयंती कार्यक्रमात आदर्श माता आणि आदर्श मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला’ यावेळी करमळकर बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, अण्णाभाऊ साठे फाऊंडेशनचे अध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे उपस्थित होते.
आज देशामध्ये लहुजींच्या देशभक्तीचे साहित्य उपलब्ध नाही, लहुजींनी समाजामध्ये भरीव कार्य केले असून त्यांचे योगदान खूप भरीव आहे. लहुजींनी सावित्रीबाई फुले यांचे संरक्षणाचे काम केले. संविधानाने जातिवाद करणे संपविला असून विनायक सावरकर, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लहुजी साळवे यांना जातीयतेच्या चौकटीत अडविणे योग्य नसल्याचे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत सबनीस यांनी मांडले.
कार्यक्रमामध्ये आदर्श माता, आदर्श मान्यवर तसेच पत्रकारांचे विशेष सत्कार करण्यात आले, याप्रसंगी राखी रासकर यांनी सावित्री वंदना सादर केली. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष राजेश रासगे यांनी केले. कार्यक्रमामध्ये शंकर शिंदे, रमेश मोहिते, संजय डावरे तसेच मोठ्या संख्येने महिला, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ उज्ज्वला हातागळे तर रवींद्र सोनवणे यांनी आभारप्रदर्शन व्यक्त केले.