- काम त्वरित पूर्ण करून लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप करा..
- गटनेते कैलास बारणे यांची पीएमआरडीए आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने वाल्हेकरवाडी येथील सेक्टर क्रमांक ३० व ३२ मध्ये सामान्य नागरिकांना परवडणारा गृहप्रकल्प राबविला जात आहे. सहा वर्षांची मुदत संपूनही गृहप्रकल्प पूर्ण झालेला नाही. कामचुकार अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी तक्रार महापालिकेचे अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे यांनी केली आहे.
त्यासंदर्भात त्यांनी पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे सोमवारी (दि. २७) तक्रार केली आहे. गृहप्रकल्प उभारण्यासाठी औरंगाबादच्या एलोरा कन्स्ट्रक्शनला ६५ कोटी ८२ लाख खर्चाचे काम देण्यात आले आहे. कामाची वर्क ऑर्डर ७ जानेवारी २०१६ ला देण्यात आली. कामाची मुदत साडेतीन वर्षे होती. त्यानुसार ६ जुलै २०१९ ला ती मुदत संपली. मुदत संपून अडीच वर्षे झाली तरी अद्याप काम अपूर्ण आहे.
कोरोनाची लाट मार्च २०१९ ला आली. त्यानंतर लॉकडाऊन लागला. त्यापूर्वी गृहप्रकल्पांचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ठेकेदारांनी कामचुकारपणा व दिरंगाई केल्याने आणि संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने काम अद्याप पूर्ण झालेले नाही. लाभार्थ्यांना घरे मिळालेली नाहीत. कामचुकार ठेकेदारावर कारवाई न करता त्याला मुदतवाढ दिले जात आहे. यावर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. काम त्वरित पूर्ण करून सदनिकांची विक्री करावी, अशी मागणी बारणे यांनी केली आहे.