- नवीन वर्षात उन्नती सोशल फाउंडेशनने दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२१) :- निसर्ग सुरक्षित राहिला तरच पृथ्वीवरील प्रत्येक जीव सुरक्षित राहू शकतो. वृक्षांचे संवर्धन झाले तरच निसर्ग सुरक्षित राहू शकतो. याच वृक्षांमुळे मिळणाऱ्या नैसर्गिक आनंदाची अनुभुती घ्यायची असेल तर प्रत्येकाने आवर्जून वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे, असा संदेश उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी दिला आहे.
नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने रोप वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे वैशिष्ट म्हणजे २०२२ सालाच्या आगमनाचे औचित्य साधून फाउंडेशनच्या वतीने २०२२ रोपांचे वाटप करून नवीन वर्षाचे हटके स्वागत करण्यात आले.
यावेळी फाउंडेशनचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, शंकर चोंधे, शेखर काटे, समाजसेविका शारदाताई मुंढे, विकास काटे, सागर बिरारी, राजेंद्रनाथ जयस्वाल, ज्येष्ठ नागरिक, आनंद हास्य क्लब यांच्यासह पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी प्रत्येक नागरिकांना रोपाचे वाटप करून सदर रोपाचे योग्य पद्धतीने संवर्धन करण्याचे आवाहन केले. तसेच प्रत्येकानेच आपल्या आसपास असलेल्या निसर्गाची काळजी घेण्याचा व इतरांनाही यासाठी प्रवृत्त करण्याचा संकल्प यावेळी केला.
दरम्यान, नवीन वर्षातही अनेक नवनवीन व समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील. व त्यामाध्यमातून जनसेवा अखंड सुरु ठेवण्याचा संकल्पही फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे व अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी यावेळी केला.















