- मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा विषयांच्या परीक्षा होणार या तारखेला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. फेब्रुवारी २०२२) :- राज्यातील इयत्ता १२ वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. १२ वीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होत आहे. मात्र, आता ५ मार्च आणि ७ मार्चला होणाऱ्या विषयांची परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय.
यात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा विषयांचा समावेश आहे. नुकतीच अहमदनगरमधील संगमनेर येथे १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग लागल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. १२ वीचा ५ मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता ५ एप्रिलला होणार आहे, तर ७ मार्चला होणारा मराठीचा पेपर हा ७ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.
मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, “यावर्षी मंडळाची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहे. ४ मार्चला इंग्रजीचा पेपर होईल. परंतू ५ मार्च आणि ७ मार्चला दुसऱ्या आणि तिसऱ्या भाषा विषयाची परीक्षा होती. बुधवारी (२३ फेब्रुवारी) दुर्दैवाने एक घटना घडली त्यात पुणे विभागाकडे येणारा प्रश्नपत्रिकांचा ट्रक जळून खाक झाला. त्या ट्रकमध्ये ५ आणि ७ मार्चच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका होत्या. त्यामुळे राज्यभरातील ५ आणि ७ मार्चच्या परीक्षा पुढे नेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयानुसार ५ मार्चची परीक्षा ५ एप्रिलला होईल आणि ७ मार्चची परीक्षा ७ एप्रिलला होईल. “











