- शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाची पोलीसांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२२) :- ‘आयएनएस विक्रांत’ हे लढाउ जहाज सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यभरातुन करोडो रूपये जमा करण्याची मोहीम भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी हाती घेतली होती. या मोहीमेच्या माध्यमातून सोमय्या यांनी दोनशे कोटींचा निधी संकलीत करून राज्यपालांकडे सुपूर्द करण्याची ग्वाही दिली होती. त्यातील एक रूपयाही राज्यपालांकडे दिला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दोनशे कोटींचा निधी हडप करणाऱ्या किरिट सोमय्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांनी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्याकडे केली आहे.
चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख वैभव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने चिंचवड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांची भेट घेतली. सोमय्या यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे शहर संघटक संतोष सौंदणकर, शहर समन्वयक महेश कलाल, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, विभागप्रमुख किरण दळवी, जेष्ठ शिवसैनिक बाबासाहेब भोंडवे, हेमचंद्र जावळे, बाळकृष्ण पिल्ले, किसन शेलार, खामकर, विभागप्रमुख श्रीमंत गिरी, युवासेना अधिकारी माऊली जगताप, विभागप्रमुख संदीप भालेकर, शिवाजीराव पाटील, राजेश आरसुळ, उपजिल्हाप्रमुख वैशाली मराठे, उपविभागप्रमुख कुदरत खान, अजित ढोबळे, राज गिरी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
उप जिल्हाप्रमुख वैशालीताई मराठे म्हणाल्या की, ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेने १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. मात्र तिची वयोमर्यादा संपल्यामुळे ती भंगारात जमा होणार होती. आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्या यांनी निधी उभारण्याकामी काही वर्षांपूर्वी मोहीम राबवली होती. आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी ‘ सेव्ह विक्रांत ‘ चळवळ उभी केली. त्यावेळी २०० कोटी रूपये राजभवनात जमा करू, असं सोमय्या यांनी सांगितले होते. परंतु राजभवनात पैसे न देता पैशांचा अपहार केला. त्यामुळे सोमय्यावर कारवाई झालीच पाहिजे.
संतोष सौंदणकर म्हणाले की, २०१३ – २०१५ मध्ये विक्रांत नौकेसाठी सोमय्या यांनी विविध स्थानकाच्या बाहेर उभे राहून सर्वसामान्य नागरिक, नेव्ही ऑफिसर, कर्मचारी यांच्याकडून लोकवर्गणीच्या माध्यमातून शेकडो कोटींच्या घरात निधी जमा केला होता. परंतु, आयएनएस विक्रांत (INS Vikrant) वाचवण्यासाठी जमा केलेला निधी राज्यपाल कार्यालयात पोहचलाच नाही, असा धक्कादायक खुलासा राज्यपाल कार्यालयाकडून माहितीच्या अधिकारात उघड झाला आहे. यात असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे दोनशे कोटींचा हिशोब सोमय्यांना विचारण्यात यावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
अनंत कोऱ्हाळे म्हणाले, आयएनएस विक्रांतचे पैसे सोमय्यांनी त्यांच्या मुलाच्या कंपनीत आणि निवडणूकीसाठी वापरले, असा आरोप त्यांच्यावर होत आहे. ‘सोमय्यांनी देशद्रोह केला आहे, त्यांनी १०० कोटींच्यावर घोटाळा केला आहे. हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांच्याकडून पै न पै चा हिशोब घ्यावा. राष्ट्राप्रती त्यांची गद्दारी खपवून घेतली जाणार नाही. आपण तत्काळ किरीट सोमय्या यांची उचलबांगडी करून त्यांची चौकशी करावी. याकामी मदत करणाऱ्या दोषी व्यक्तींवर देखील कठोर कारवाई करावी. राष्ट्राची संपत्ती हडप करून त्यावर आपली पोळी भाजणाऱ्या किरीट सोमय्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे.