- राज्य सरकार, पालिका आयुक्त आणि रेल्वेला बनविले प्रतिवादी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२२) :- चिंचवड स्टेशन येथील रेल्वेकडेच्या झोपड्या वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक काळूराम पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
चिंचवड स्टेशन येथील रेल्वेच्या हद्दीतील आनंदनगर मधील ९७६ घरांना आणि साईबाबानगर मधील ४९० घरांना ११ एप्रिल २०२२ रोजी सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार जागा खाली करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावली होती. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड महापालिकेचे विधी समितीचे माजी सभापती काळूराम पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेची एक प्रत येथील रेल्वेच्या लीगल अडव्हायझर यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आली. या याचिकेत महाराष्ट्र राज्य सरकार, डिव्हिजनल रेल्वे ऑफिस, सोमवार पेठ, असिस्टंट रेजिओनल इंजिनिअरिंग, पिंपरी महापालिका आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने १९८४ साली आनंदनगर येथील लोकवस्तीला झोपडपट्टी म्हणून घोषित केले. याठिकाणी झोपडपट्टीमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेल्वेच्या विनंतीनुसार रेल्वेच्या लगत असणाऱ्या जागेत महापालिका प्रशासनाने दोन कोटींची सीमाभिंत बांधली. ही बाब वकिलांमार्फत निदर्शनास आणून दिली. उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली आहे, असे पवार यांनी सांगितले.