- आयआयबीएमचे विभागप्रमुख अमोल भागवत ” कर्तव्यदक्ष-गुरुगौरव ” पुरस्काराने सन्मानित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२२) :- खिशात दमडी नसतानाही काही वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी परिसरातून आद्योगिकनगरी पिंपरी चिंचवड शहरात रोजगारासाठी आलो. शहरात आल्यानंतर प्रथमत: खायचे वांदे होते मग रहायचे कुठे? हा प्रश्न अनाकलनीयच ठरला. संघर्ष अंगात भिनलेला असेल, तर सामान्य व्यक्तीही असामान्यत्व गाठू शकते. या उक्तीप्रमाणे जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि तिच्या जोडीला विश्वासाहर्ता या पंचसुत्रीच्या बळावर मिळेल ती कामगिरी फत्ते केली. त्याच्याच जोरावर आज शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करू शकलो. या कामगिरीची माध्यमांनी दखल घेऊन माझी ” कर्तव्यदक्ष – गुरुगौरव ” या पुरस्कारासाठी निवड केली. या पुरस्काराने माझ्या आजवरच्या कामगिरीचा सुवर्णमध्य साधला आहे, असे प्रतिपादन पुरस्काराचे मानकरी चिखलीतील आयआयबीएम कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत यांनी केले.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अबरार सय्यद यांच्या हस्ते अमोल भागवत यांना नुकतेच ” कर्तव्यदक्ष – गुरुगौरव ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कॉलेजचे प्रशासकीय प्रमुख प्रतीक्षा डफळ, सचिन बरबडे, मिलिंद उशीर, शहाबाज काजी आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना भागवत म्हणाले, शहरातील व्यवस्थापनात क्षेत्रातील अग्रेसर अशा आयआयबीएम शिक्षण संस्थेचा विभागप्रमुख या नात्याने गेली १२ वर्षे विद्यार्थ्यांना व्यवसायिक शिक्षणाचे धडे गिरवत आहे. देशाच्या प्रगतीमध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱ्या एअरलाइन्स, जहाज व्यवस्थापन, पर्यटन, इव्हेंट मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, रेल्वे केटरिंग, बहुराष्ट्रीय कंपन्या अशा अग्रगण्य क्षेत्रांमध्ये संस्थेचे विद्यार्थी स्वतःची आणि संस्थेची छाप पाडत आहेत. शिक्षण क्षेत्रातील माझे पहिले गुरु अनं संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील विद्यार्थ्यांची प्रगती, त्यांना नोकरीच्या संधी, त्यांचे उज्वल भविष्य, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. त्याद्वारे संस्थेच्या प्रगतीसाठी झटत आहे. गुणवत्तापूर्वक शिक्षणासाठी विद्यार्थ्याची बौद्धिक कुवत, व्यक्तिमत्त्व, संवाद कौशल्य, आत्मविश्वास शिवाय विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना ज्या अडचणी येतात त्या सोडविण्याला मी प्रथम प्राधान्य देतो.
” शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातदेखील खारीचा वाटा उचलण्याची संधी मला मिळाली. कोविड काळात कुटुंबांना अन्नधान्य, महिला, लहान मुले, गरजू लोकांसाठी आर्थिक मदत, शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील गावचा पाणीप्रश्न देखील कायमचा सोडविला”.
– मा. अमोल भागवत, विभागप्रमुख – आयआयबीएम कॉलेज, चिखली…